Breaking News

छगन भुजबळ यांचा टोला, जर आम्ही शुद्र असू’… तर तुम्ही का होताय…

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आम्ही एवढंच मागतोय. परंतु कुणी दादागिरीची भाषा करत असेल तर आम्ही देखील दादागिरीने उत्तर देऊ असे सांगत मंडलच्यावेळी देखील सर्व एकत्र येऊन लढले होते. आताही ओबीसींच आरक्षण वाचविण्यासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी पुढं यायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केल.

आज इंदापूर येथे राज्यभरातील ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास बहुसंख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. यावेळी प्रकाश शेंडगे, माजी मंत्री आ.महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा.लक्ष्मण गायकवाड, मुस्लिम ओबीसी संघाचे शब्बीर अन्सारी, प्रा.टी.पी.मुंडे, आगरी नेते प्रा राजाराम पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, रामोशी समाजाचे नेते दौलत शितोळे, इतर मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा .लक्ष्मण हाके, नाभिक समाजाचे नेते कल्याण दळे, आयोजक अॅड.कृष्णाजी यादव, पांडुरंग शिंदे, यांच्यासह सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाज व इंदापूर येथील पदाधिकारी व ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचं काम करतोय असे लोक म्हणतात. त्यांना सांगायचं आहे की, त्यांच्या पंधरा सभा झाल्यानंतर आम्ही ‘सौ सोनार की एक लोहार की’ म्हणून एक सभा घेऊन आमची भुमिका मांडत आहोत. अशावेळी मात्र त्यांना कायद्यात सुट दिली जातेय. त्यांना कायदा वेगळा लावला जातोय त्यावर कुणीही बोलायला तयार नाही. त्यांना कायद्याची सुट आणि आम्हाला मात्र कायदा लावला जातोय अस दिसतंय. त्यामुळे राज्यात अशांतता कोण निर्माण करतंय याचा सर्वांनी अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, राहता तालुक्यात मतदानाचा राग मनात ठेऊन दलित कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागे असाच प्रकार तुळशी गावात नाभिक समाजाच्या बाबतीत झाला राज्यात नेमकं चाललंय काय ? या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही ? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाची ? असा सवाल उपस्थित करत राज्यात अनेक पोलीस आंदोलनात जखमी झाले मग या राज्यात अशांतता निर्माण कोण करतोय ? असा सवाल उपस्थित करत दादागिरीला दादागिरीने उत्तर दिलं जाईल असा इशारा देत पोलिसांवरील हल्ले थांबवा त्यांच्या भडकावू भाषणांना थांबवा अन्यथा जशाच तसं उत्तर आम्हीही देऊ शकतो असा इशाराही यावेळी दिला.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, तुमचा हिशोब करू अशी भाषा केली जाते आहे. अशावेळी राज्यातील मराठे नेते गप्प का बसले आहे. ते सत्य परिस्थिती का मांडत नाहीत ? मराठा समाजातील मोठे मोठे नेते का बोलायला तयार नाही ? त्यांना कसली भीती वाटतेय ? निवडणुकीतील मतांची वाटते आहे का ? मतासाठी घाबरता आहे का ? असा सवाल करत त्यांच्या कडे २० टक्के मत असतील तर आमच्या कडे ८० टक्के मते आहे याचा विचार करावा. तसेच सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असे म्हटलं जाते. सर्वांना कुणबी प्रमाणपत्र दिले तर मराठा समाज राहणार नाही अशी स्पष्ट केले.

छगन भुजबळ म्हणाले की, समाजातील वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याण्यासाठी आरक्षण आहे. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही हे त्यांना कोण सांगणार असा खोटक टोला लगावत ओबीसी समाजातील अनेक जातींमधील अतिमागास जातींना वेगळ आरक्षण दिल आहे. आता केवळ १७ टक्के आरक्षण शिल्लक असून त्यात ३७५ हून अधिक जातींचा समावेश आहे. त्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका आम्ही एवढंच मागतोय. मराठा समाजाला विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातोय. त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. मात्र त्यांना जे दिल जातंय ते ओबीसींना द्या एवढीच आमची मागणी असल्याची ठाम मागणीही केली.

पुढे बोलताना छगन भुजबळ बोलताना म्हणाले, या राज्यात गावबंदी सगळ्यांना आहे. मात्र एक विशिष्ट पक्षाच्या लोकांना गाव बंदी नाही हा कुठला प्रकार आहे अशी टीका रोहित पवार यांचे नाव न घेता करत अद्यापही गावबंदीचे बोर्ड हटवले जात नाही. जे त्या विरुद्ध बोलत आहे त्यांना मारल जातंय….आमच्या लोकांनी काही बोललं तर पोलीस कारवाई करणार… मात्र त्यांनी काहीही केलं तरी पोलीस काही करणार नाही हा कुठला कायदा आहे. संयमाचा अंत पाहू नका त्यांचा क्रोध वाढला तर त्यांच्या क्रोधाला कुणी आळा घालू शकत नाही. त्यामुळे शासन आणि पोलीस यंत्रणेने वेळीस यावर लक्ष दिल पाहिजे असेही मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता इशारा दिला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं. तेथील शेतकऱ्यांनी मला फोन केला की तुम्ही बघायला या. त्यावेळी मी पाहणीस गेलो. तीन लाखांच्या मतदारसंघात तीस लोक गो बॅक चे बोर्ड घेऊन पुढे आले. अगदी सगळ्या ठिकाणी तेच होते. त्यानंतर मी ज्या रस्त्यांनी गेलो ते रस्ते आम्ही शुद्र आहोत म्हणून गोमुत्र टाकून साफ केलं. मग आम्ही जर शुद्र असू तर प्रमाणपत्र घेऊन शुद्र का होताय ? असा सवाल उपस्थित केला.

शेवटी पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, बिहार सारखे राज्य जातनिहाय जनगणना करू शकते, मग महाराष्ट्र का करू शकत नाही. महाराष्ट्रात देखील जात निहाय जनगणना करायला हवी. शिंदे आयोगाचे अध्यक्ष न्यामूर्ती शिंदे जी भूमिका घेत आहे त्याला आपला विरोध असून गेल्या दोन महिन्यात देण्यात आलेले कुणबी दाखले रद्द करावे. ओबीसींचा नोकऱ्यामधील अनुशेष भरून काढावा. मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्याव. ओबीसी आरक्षणाला धक्का लाऊ नये अशा मागण्या यावेळी केल्या.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *