दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे हे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा देत बीड आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या युवकांव कितीही गुन्हे दाखल केले तरी घाबरणार की खचणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला.
काही दिवसांपूर्वी राज्यातील बीड, नांदेड, सोलापूर, हिंगोली, लातूर आदी जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. काही ठिकाणी आमदारांच्या घरावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील जवळपास ७ हजार जणांची यादी पोलिसांनी तयार केली असून काही मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.
यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील म्हणाले, उगाच मराठा समाजातील तरूणांवर खोटे गुन्हे दाखल करू नका. आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत मराठा समाज शांततेत आंदोलन करत आला आहे. पण सत्ताधारी ओबीसी नेत्यांच्या सांगण्यावरून अशा पध्दतीचे गुन्हे दाखल करणार असाल तर बीड जिल्हा आणि महाराष्ट्र कदापी हे सहन करणार नाही असा इशाराही दिला.
तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, खोटे गुन्हे मराठ्यांच्या मुलांवर टाकून कितीही दबाव टाकला तरी आंदोलन मोडीत निघणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आणि घाबरणार, खचणार नाही असा निर्धारही व्यक्त केला.
राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील मराठा युवकांवर अटकेची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी देत म्हणाले, खोटे गुन्हे टाकून विनाकारण जातीयवाद निर्माण केला जात आहे. घटनात्मक पदावर असलेल्या ओबीसी नेत्यांकडून मराठ्यांच्या पोरांना अटक करण्याचे आदेश दिल्याचा आरोपही सत्ताधाऱ्यांवर केला.