राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अर्थात आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांनी भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही या त्यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या २४ तासातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुणे आणि कोल्हापुरात ईडी छापे टाकते याबाबत महेश तपासे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
भाजपा सातत्याने केंद्र सरकारचा वापर करत आहे. महाविकास आघाडी कमकुवत करण्यासाठी आणि नेत्यांना भाजपामध्ये आकर्षित करण्यासाठी एजन्सींचा गैरवापर होत असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला.
भाजपाचे काही नेते भविष्यात ईडीच्या छाप्यांबाबत माध्यमातून वक्तव्य करतात आणि तसेच घडते हे विडंबनात्मक नाही का? असा सवाल महेश तपासे यांनी केला.
शिंदे – फडणवीस सरकारच्या पाठीशी असलेल्या आमदार – खासदारांवरील सर्व आरोपांचे काय झाले? भाजपाने या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ईडी, आयटीने तपास बंद करून त्यांना निर्दोष सोडले आहे का? असा सवाल महेश तपासे यांनी भाजपाला केला.