मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील भाजप-शिवसेनेला सत्तेची मस्ती आली असून ही मस्ती महाराष्ट्रातील जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही. सरकारला मस्ती आल्यानेच राज्यात मँग्नेटीकचे नव्हे तर फर्स्टट्रेड अर्थात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले असून धड सरकारी धर्म ना पाळला ना शेतकरी धर्म पाळला असल्याची टीका विरोधकांनी करत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची घोषणाही केली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेकाप, पीआरपी या पक्षांच्या गटनेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्याविषयीची रणनीती ठरविण्यात आली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, संजय दत्त, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते.
काही महिन्यापूर्वी राज्यातील कापूस आणि धान शेतीवर बोंडअळी व तुटतुड्याचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. याचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र प्रत्यक्षात हे पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्याशिवाय या प्रादुर्भावाची नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे आर्थिक निधी मागण्यात आला. परंतु अशा प्रादुर्भावा आर्थिक नुकसान भरपाई देत येत नसल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी मांडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. तसेच हे सरकार कोडग सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीची योजना जाहीर व्हायला पाहीजे. पण सरकारने अटी-शर्तीच्या बंधनात शेतकऱ्यांना गुतंवित कर्जमाफीचा लाभच मिळू दिला नसल्याचा आरोप करत जितक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. तितक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. तसेच कर्जमाफीच्या जाहीरातींवरच मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
त्याचबरोबर कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची यादी तपासून घेण्याची घोषणा शिवसेनेने केली. त्यासाठी त्यांनी ढोल बजाव आंदोलनही केले. मात्र आतापर्यंत त्यांनी किती याद्या तपासून घेतल्या अशी उपरोधिक टीका ही त्यांनी शिवसेनेवर केली.
मेक इन महाराष्ट्र, मँग्नेटीक महाराष्ट्रच्या माध्यमातून लाखो जणांना रोजगार मिळण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात या दोन्हीतून किती रोजगार निर्माण झाला याची माहिती राज्य सरकारनेच द्यावी अशी मागणी करत रोजगार आणि गुंतवणूकीबाबत राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार- विखे
राज्य सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात कागदपत्रासह सर्व पुरावे सरकारला सादर केले. मात्र सरकारकडून सातत्याने क्लीन चीट देण्यात येत असल्याने सरकारवर विश्वास राहीलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील जनताच मस्ती उतरवेल-मुंडे
राज्य सरकारला सत्तेची मस्ती आली असून ही मस्ती जनताच उतरवून टाकणार असून त्याचे काऊंट डाऊन सुरु झाल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
राज्यातील सर्व एम्प्लॉयमेंट कार्यालयातील बेरोजगारांची संख्या ३६ लाख आहे. मात्र सरकारमध्ये ३७ लाख लोकांना रोजगार मिळणार याचा अर्थ राहीलेल्या एका वर्षात राज्यातील बेरोजगारांचा प्रश्न निकाली निघणार का? असा सवाल उपस्थित करत कदाचित सरकारच्या उद्योग धोरणात मँग्नेटीक राहीलेले नसल्यानेच त्यांनी मँग्नेटीक महाराष्ट्रचे आयोजन करण्यात आल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.
या सरकारला निवडणूकीच्या काळात शिवाजी महाराज आठवतात. मात्र त्यांची जयंती आलेली असताना त्यांच्या जयंतीची एखादी जाहीरातीही या सरकारने दिली नाही. उलट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्याच जाहीराती सर्वत्र दिसल्याची टीकाही त्यांनी केली.