नागपूर : प्रतिनिधी
कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प जोपर्यंत सरकारकडून जाणार असल्याचे जाहीर करत नाही. तोपर्यंत कॉंग्रेस सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिला. बुधवारी नाणारवासियांनी विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतर हा प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये श्रेय घेण्यावरून राजकिय कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच रंगले.
त्यातच आज गुरूवारी या प्रकरणी सकाळपासूनच काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करत सरकार विरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु होताच सभागृहातही यासंदर्भात भूमिका मांडली.
परंतु काँग्रेसने मांडलेल्या एका पक्षाविषयीच्या भूमिकेला शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी हरकत घेत नाणार प्रश्नी विरोधी पक्षनेते सभागृहाची दिशाभूल करत असून शिवसेनेविषयीही मांडलेली भूमिका चूकीची असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
तसेच नाणारचे रहिवाशी काल मोर्चा घेवून आले आणि त्यांनी धरणे आंदोलन सुरु केले. याबाबतची माहिती शिवसेनेचे राजन साळवी यांनी सभागृहात सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच मोर्चेकऱ्यांसमोर समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी भाषण केले. त्यावेळी वालम यांनी शिवसेनेमुळे हा प्रकल्प होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोलियम मंत्री प्रधान आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी भेट नाकारली यातच सर्व आल्याचे वालम यांचे वाक्य असल्याचेही त्यांनी यावेळी भाषणा दरम्यान सांगितल्याची आठवण प्रभू यांनी सांगितले.
दरम्यान कॉंग्रेसच्या सदस्यांकडून प्रभू यांच्या वक्तव्याचा विरोध करत होते. त्यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने अखेर सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांनी या प्रकल्पामुळे कोकण आणि शेजारील कोल्हापूर आणि अन्य जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्यामुळे याप्रकरणी तातडीने चर्चा घ्यावी अशी मागणी करत शिवसेनेनेही आपली भूमिका वैधानिक आणि कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करून मांडावी असे आवाहन त्यांनी केले.
नाणार प्रकल्प होवू नये यासाठी प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही आपले मत मांडले आहे. त्यामुळे असा विनाशकारी प्रकल्प होवून विकास होणार नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
परंतु अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याप्रकरणी आता चर्चा करणार नसल्याचे सांगत प्रश्नोत्तरे पुकारली. अध्यक्षांच्या या निर्णयामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत नाणार जाणार, रद्द करा रद्द करा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पुन्हा अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले.