मागील काही महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे सातत्याने आपल्या राजकिय भूमिकेत धरसोडपणा करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच मागील दोन-तीन जाहिर सभेत राज ठाकरे यांनी हिंदूत्ववादी भूमिका जाहिरपणे घेतली. भाजपाच्या अनुशंगाने भूमिका मांडली. मात्र काल मनसे गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी काही प्रमाणात यु टर्न घेत महापुरूषांची बदनामी करण्याचे थांबवा असे आवाहन भाजपा आणि काँग्रेसला केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावत म्हणाले, एकाबाजूला महापुरूषांबद्दल बोलू नका आणि दुसऱ्याबाजूला महापुरूषांचे विद्रुपीकरण करणाऱ्या चित्रपटाला आवाज द्यायचं अशी खोचक टीका केली.
हर हर महादेव चित्रपटात मनोविकृती दाखवण्यात आली आहे. इतिहासाचं विकृतीकरण दाखवण्यात आलं आहे. याच कारणामुळे मला काही लोकांकडून अपेक्षा होत्या. एकीकडे महापुरूषांबद्दल काहीही बोलू नका असे म्हणायचे आणि दुसरीकडे ज्या चित्रपटात इतिहासाचे विद्रुपीकरण देण्यात आले, त्या चित्रपटाला राज ठाकरे यांनी आवाज दिला. या चित्रपटात काय आहे, याबाबत राज ठाकरे यांना माहिती नव्हते का? तरीदेखील त्यांचे लोक हा चित्रपट मोफत दाखवत होते, अशी टीका केली.
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपल्याला कधीकधी निर्णय घ्यावे लागतात. इथे एक निर्णय आणि तिथे एक निर्णय असे चालत नाही. राज ठाकरे काल जे बोलले त्यावर त्यांनी कायम राहावे. चित्रपटासाठी वेगळी भूमिका, नाटकांसाठी वेगळी भूमिका, पुस्तकांसाठी वेगळी भूमिका आणि बोलताना वेगळी भूमिका असे चालत नाही. एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका घेता येत नाहीत. महाराष्ट्र शिवरायांचं विकृतीकरण, इतिहासाचं विद्रुपीकरण सहन करणार नाही. प्रत्येक मराठी माणसाच्या हे मनात हवं, असेही सांगितले.