राज्यात तीन ते चार महिन्यापूर्वी सत्तेत होते ते वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत टीका करत आहेत. बुलेट ट्रेन, रिफायनरी, नाणार प्रकल्प थांबविणारे लोक आता बोलत आहेत. हे सगळे हजारो कोटींचे प्रकल्प राज्याच्या हिताचेच होते. मुंबईमधील आर कारशेडला विरोध करणारे कोण आहेत ? या शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेदांत फॅाक्सकॅान प्रकल्पाच्या स्थलांतरावरून विरोधकांना सुनावले. तीन वर्षापूर्वी पर्यंत सत्तेत असलेल्यांनी विरोध केलेल्या प्रकल्पांचा गुजरातला कोणता फायदा होणार होता ? अशी विचारणाही केली.
विविध सरकारी योजनांमधील लाभार्थ्यांशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी भोर जवळील वरवे या गावी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील वेदांत फॅाक्सकॅान प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत झाला आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळेच हा प्रकल्प गुजरात केल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात निर्मला सीतारामन यांना विचारले असता त्यांनी या प्रश्नाला सोईस्कर बगल देत विरोधकांवरच पलटवार केला.
राज्याच्या हिताचे हजारो कोटींचे प्रकल्पांना तेंव्हा सत्तेत असलेल्यांनी विरोध केला. बुलेट ट्रेन, पालघर येथील प्रकल्प, पोर्ट, नाणार रिफायनरी या सारख्या पाच महाराष्ट्राच्या हितासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना कोणी विरोध केला? वेदांत प्रकल्पावरून विरोधक केवळ राजकारण करत आहेत. मुंबई येथील आर कारशेडला कोणाचा विरोध आहे. त्यातून कोणाचे नुकसान झाले आणि गुजराताला काय फायदा झाला, असा सवालही त्यांनी यावेळी विरोधकांना केला.
भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला की सक्त वसुली संचलनालयाची (ईडी) चौकशी लागत नाही. भाजपाकडे वॅाशिंग मशीन आहे, अशी टीका बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होते. त्यालाही सीतारामन यांनी उत्तर दिले. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौरा आणि ईडीचा काही संबंध नाही. ईडीच्या कारवाईमध्ये लुडबूड करण्याचा प्रश्नच येत नाही. आर्थिक गैरव्यवहार झाला असेल किंवा तसा संशय असल्यास तर ईडीकडून कारवाई केली जाते, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
महागाईबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाले, महागाईबाबत लोकसभेत प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अमेरिका, जर्मनी येथेही तुर्कीमध्ये पण महागाई वाढली आहे आणि भारताची परिस्थिती बदलण्यासाठी विविध स्तरावर उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.