मुंबई: प्रतिनिधी
सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी चांगले काम सुरु केले आहे. प्रत्येक गावामध्ये सर्व कामे बाजूला ठेवून मेहनत करणारी माणसे पहायला मिळत असून वॉटर कप आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्याला २०१९ अखेर पर्यंत राज्याला दुष्काळ मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धा जाहीर करण्याकरीता मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फ़डणवीस यांच्यासह पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान, प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा, फाऊंडेशनचे मुख्याधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्थित होते.
वॉटर कप स्पर्धेमुळे स्वावलंबी आणि एकसंघ झालेली गावं राज्यात पहायला मिळत आहेत.राज्य पाणीदार करायचे असेल तर मोठ्या धरणापेक्षा जलसंधारण आवश्यक आहे, हे हेरून जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. यामध्ये जनतेमध्ये सहभाग महत्त्वाचा असून हा जनतेचा उपक्रम म्हणून राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
वॉटर कप स्पर्धेत जनता, स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट कंपन्या यांबरोबरच सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीनीही बहुमोल सहकार्य केले. पहिल्यांदा कार्पोरेट कंपन्यांनी समाजातील शेवटच्या टोकाच्या माणसाचा विचार करून या उपक्रमात सहभाग घेतला. जनता, स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट कंपन्या, सेलिब्रिटी, शासन यांची युती झाली आहे. यातून मोठे परिवर्तन होत आहे. या वर्षीच्या स्पर्धेतून एक चतुर्थ महाराष्ट्र भाग घेणार आहे. लोकचळवळ असेल तर परिवर्तन अधिक वेगाने होणार आहे. याबरोबरच या चळवळीला शासकीय योजनांचे संलग्निकरणं करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
या स्पर्धेसाठी राज्य सरकार सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगत या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये व ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून स्पर्धेत आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. मिळणार असल्याचे अभिनेता आमिर खानने सांगितले.