लोकसभा निवडणूक २०२४ च्या राजकिय लढाईचा ज्वर आता वाढायला लागला आहे. आतापर्यंत निवडणूकीसह रोजच्या रोज देशातील चर्चेचे मुद्दे आणि प्रचाराचे मुद्दे अग्रकमाबाबत भाजपा नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहिर करण्यापासून ते प्रचाराची दिशा ठरविण्याबाबत सध्यातरी भाजपाचा वरचष्मा दिसून येतो. परंतु यावेळी भाजपाच्या तोडीस तोड काँग्रेसने अनेक गोष्टीत पुढाकार घेत भाजपाला धोबी पछाड देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
आज दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेसने आपला जाहिरनामा प्रसिध्द केला असून या जाहिरनाम्याला “न्याय पत्र” असे नाव जाहिरनाम्याच्या पुस्तिकेला दिले. काँग्रेसने आपल्या “न्याय पत्र” या जाहिरनाम्यात सर्वप्रथम देशातील तरुणाईच्या बेरोजगारीवर बोट ठेवले आहे. मागील १० वर्षात देशातील बेरोजगारीचा दर ८ टक्के असून पदवीधर बेरोजगार तरूणांची संख्या ४० टक्के आहे.
त्यानंतर मागील १८ महिन्यापासून रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना मोठ्या कार्पोरेट कंपन्यांचे गुलाम बनविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही भाजपाचे नाव न घेता केला. त्याचबरोबर जीएसटीमुळे देशातील व्यापारी वर्गाची लूट सुरु असून सूक्ष्म आणि लघु उद्योगांवर परिणाम होत आहे. तसेच या जीएसटी वसूलीचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या मुक्त व्यापार संकल्पनेलाही छेट देत आहे.
याशिवाय २०१४ ते २०२४ या कालावधी महिलांवरील अत्याचारात ३१ टक्क्याने वाढ झाली आहे. तसेच देशातील मोठमोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असून ती भरलीच गेली नाहीत. त्यामुळे घटनेने दिलेल्या आरक्षणामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी वर्गातील तरूण बेरोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. त्यामुळे या वर्गातील जनता आपले आर्थिक अधिकार गमावण्याची पाळी आली आहे. त्याचबरोबर आदिवासी समुदायाला वन अधिकार या घटनात्मक अधिकारापासून दूर ठेवण्यात येत आहे. देशातील वाढत्या तिरस्काराच्या भावना वाढत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहिरनाम्यात ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. याशिवाय युवा बेरोजगार, मजूर, महिलांना १ लाख रूपयांची मदत देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. त्याचबरोबर शिक्षण आणि शेतकऱ्यांना कायदेशीर एमएसपी देण्याचे आश्वासनही शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
काँग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यात ग्यान GYAN अर्थात G- गरीब, Y-युवा, A- अन्नदाता आणि N- नारी यांना केंद्रस्थानी ठेवून जाहिरनामा तयार करण्यात आला आहे.
जाहिरनाम्यातील महत्वाच्या घोषणाः-
३० लाख तरूणांना नोकऱ्या उपलब्ध करून देणार
शेतकऱ्यांच्या मालाला कायदेशीर आधारभूत किंमत देणार
शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्यास एक महिन्यात नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींवरील जीएसटी हटविणार
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार
आरक्षणाची मर्यादा वाढविणार
सरकारमधील कंत्राटी नोकऱ्यांची पध्दत बंद
अग्नीवीर योजनेत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे कायम भरतीची योजना लागू करणार
विद्यार्थ्यांचा छळ होऊ नये म्हणून रोहित वेमुला कायदा लागू
१ ली ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
बेरोजगार भत्याची रक्कम थेट खात्यात पाठविणार
महिलांना आणि सुशिक्षित बेरोजगारांना १ रूपयांपर्यंतची मदत
असंघटीत कामगारांसाठी विमा योजना आणणार
पेपर फुटीची प्रकरणे थांबविण्यासाठी नवी योजना आणणार
पेट्रोल-डिझेल, गॅस दरात कपात करणार
LIVE: Congress party Manifesto launch for 2024 Lok Sabha elections | Haath Badlega Halaat https://t.co/QqE0551ssj
— Congress (@INCIndia) April 5, 2024