मुंबई: प्रतिनिधी
विधानसभेत विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास दर्शक ठराव संमत केल्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह मंत्र्यांनी विरोधकांना बोलूच न देण्याची भूमिका घेतल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांचे तोंड दाबल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अध्यक्षांवरील ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर तिसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर अध्यक्षांवरील विरोधकांनी मांडलेला अविश्वासाच्या ठरावाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाचन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विखे-पाटील यांचे बोलणे मध्येच थांबवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे रहात म्हणाले की, २००६ साली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला होता. त्यावेळीही अशाच पध्दतीने तो मांडत मंजूर करत सभागृहाचे कामकाज पुढे रेटून नेले. त्यामुळे त्याकाळात जर हे चालले होते. तर आजही ते ग्राह्य धरले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
त्यानंतर तालिका अध्यक्ष सुभाष साबणे यांनी जो ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच ज्याचा उल्लेख आजच्या कामकाज पत्रिकेत नाही, त्यावर चर्चा करता येणार नसल्याचे सांगत पुढील कामकाज पुकारले. त्यानुसार काँग्रेसचे सुनिल केदार हे बोलायला उभे राहीले. मात्र मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी उठून रहात अध्यक्षांवरील अविश्वास दर्शक ठरावाची कार्य पध्दती वाचवून दाखविण्यास सुरुवात केली. त्यावर मंत्री बापट यांनी त्यावर हरकत घेत तोच विषय पुन्हा मांडता येणार नसल्याची भूमिका घेत वळसे-पाटील यांना बोलू न देण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना शांत करण्यासाठी सत्ताधारी बाकावरील सर्व सदस्य उठून उभे रहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
त्यावर तालिका अध्यक्ष साबणे यांनी केदार यांना बोलण्यास सांगितले. मात्र केदार यांनी सत्ताधारी बाकावरील सदस्यांना खाली बसण्यास सांगावे आणि मला संरक्षण द्यावी अशी मागणी केली. मात्र सत्ताधारी सदस्यांकडून सातत्याने गोंधळ तसाच राहीला. त्यामुळे अखेर साबणे यांनी सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य असल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करत असल्याचे जाहीर केले.
कामकाज तहकूब केल्यानंतर सत्ताघारी बाकावरील सदस्य निघून गेल्यानंतरही विरोधी बाकावरील सर्व सदस्य विधानसभेत तसेच ठाण मांडून बसले.