विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिल्यानंतर राईट रिप्लाय अंतर्गत अजित पवार हे बोलायला उभे राहीले. मात्र मध्येच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना थांबवित त्या घटनेची माहिती देवू लागले. त्यामुळे लोकशाही संकेताचे हे सरळसरळ उल्लंघन असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगत जे काही बोलायचे ते विरोधी पक्षनेत्यांचे भाषण झाल्यानंतर बोला असे सांगत त्यांचे भाषण चालू असताना मध्येच कसे थांबविता असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना केला. त्यामुळे विधानसभेत जयंत पाटील आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात खडाजंगी रंगल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत असताना विरोधकांना तुमच्या चिठ्या काढू असे इशारा देत ती वेळ माझ्यावर येऊ देऊ नका असा गर्भित इशाराही दिला. हाच मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पकडत म्हणाले, राज्य कारभार करत असताना विरोधकांकडून आरोप हे होतच असतात. ते सहनही करायचे असते असे सांगत तुम्ही शेतकऱ्यांना मदत केल्याचे सांगता मात्र आपली चर्चा सुरु असताना सुभाष देशमुख या शेतकऱ्याने स्वतःला जाळून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा मुद्दा उपस्थित करताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांना थांबविले.
शेतकरी सुभाष देशमुख यांच्या घटनेची माहिती मिळालेली आहे. त्यानुसार देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी केलेल्या कृत्यमागे त्यांचे वैयक्तीक कारण आहे अशी माहिती अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली.
त्यावर जंयत पाटील यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, विरोधी पक्षनेते भाषण करत असताना त्यांना मध्येच थांबविण्याचे कारण काय? त्यांचे भाषण झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी बाजू मांडावी.
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष देशमुख यांच्या आत्महत्येमागे त्यांच्यातील कौटुंबिक शेतीवरून वाद आहे. त्या वादातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच शासकिय मदतीचा आणि त्याचा काहीही संबध नाही. यापूर्वी त्यांच्या वडीलांनीही अशाच पध्दतीचा प्रयत्न केला होता. मात्र देशमुख हे १५ टक्के भाजले गेले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
त्यावर जयंत पाटील यांनी पुन्हा अध्यक्ष नार्वेकर यांनी केलेल्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करत विधानभा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा भा होतोय असा संशय व्यक्त केला.
त्यावर फडणवीस म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर जयंत पाटील यांनी हेतू आरोप केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचे ते वक्तव्य कामकाज पटलावरून काढून टाकावे अशी मागणी केली. तसेच सभागृहात कोणाला बोलू द्यायचे आणि कोणाला नाही याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचाच असल्याची आठवण करून दिली.
त्यावर नार्वेकर यांनीही जयंत पाटील यांचे ते वाक्य काढून टाकण्यात येत असल्याचे जाहिर केले.
त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यातील खडाजंगी सभागृहात पाह्यला मिळाली.
त्यानंतर
विधानसभेत आज पुरवणी मागणीवर चर्चा होत असताना सभागृहात विभागाचे मंत्रीच उपस्थित नसल्याची बाबही जयंत पाटील यांन विधानसभा अध्यक्षांच्या नजरेस आणून दिली. मंत्री नाहीत तर उत्तरे कोण देणार ? उत्तर द्यायची नसतील तर खातेवाटप कशासाठी केले ? ४० दिवस विस्तार थांबवला आता उत्तराला टाळाटाळ करत आहेत असा थेट आरोपही त्यांनी सरकारवर केला.