महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघात राजकिय चुरस निर्माण झाल्याने महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाकडून चांगलीच रंगत आणली. विशेषतः नाशिक मतदारसंघातील तांबे पिता-पुत्राने केलेल्या बंडखोरीची चर्चा राज्यात चांगलीच रंगली. मात्र या मतदारसंघात अवघे ४९.२८ टक्के कमी मतदान झाले. त्यामुळे या कमी मतदानाचा फटका नेमका कोणाला भाजपाच्या पाठिंब्यावर असलेले सत्यजीत तांबे की महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या बाजी मारणार याविषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघातही फारशी चुरस निर्माण झाली नाही. मात्र तरीही थेट लढत ही महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटातच होणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातील मतदारांनीही मतदानासाठी पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले असून या ठिकाणीही अवघे ४९.६७ टक्के इतकेच मतदान झाले आहे.
औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या तिन्ही मतदारसंघात भाजपा-शिंदे गटाने आणि महाविकास आघाडीने चांगलाच जोर लावल्याचे चित्र दिसून येत आहे. औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के मतदान झाले.
या निवडणूकीच्या निमित्ताने शिंदे गटाला कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. जर कोकणात शिंदे गटाच्या म्हात्रे यांचा विजय झाल्यास शिंदे गटाचा पहिला आमदार निवडूण आल्याचे चित्र पाह्यला मिळणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरूवारी २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली.