मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील पालघर आणि भंडारा येथील दोन लोकसभा जागांसाठी आणि विधानसभेसाठी सांगली जिल्ह्यातील पलूस या मतदारसंघातील एका जागेबरोबरच विधान परिषदेच्या ६ रिक्त जागांसाठी निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना भाजप- शिवसेनेत मात्र मोठ्या प्रमाणावर दरी निर्माण झाली आहे. मात्र दुसऱ्याबाजूला पलूस आणि पालघर जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत समझोता केल्याची माहिती उघडकीस आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने पलूस विधानसभेची जागा रिक्त झाली. परंपरागत पध्दतीने या जागेवर पतंगरावांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र शिवसेनेकडून या जागी कोणताही उमेदवार न देण्याची भूमिका घेतली असून यासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि विश्वसजीत कदम यांच्यात फोनवर झालेल्या चर्चेनंतर ही भूमिका जाहीर करत त्यांना पाठिंबा जाहीर केला.
शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ही झालेली अंडरस्टँडींग फक्त पलूस या एका विधानसभेच्या जागेसाठी नसून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबतही अंडरस्टँडींग केल्याची चर्चा सुरु आहे. यात पालघरमध्ये भाजपचा विरोध डावलून शिवसेने स्व.चिंतामण वणगा यांचा मुलगा श्रीनिवास वणगा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपने तेथून काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्याने पालघर येथील जागेसाठी काँग्रेसने शिवसेनेला मदत करायची आणि पलूसमध्ये शिवसेना काँग्रेसला मदत करणार तर भंडारा-गोंदीयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचे काँग्रेसमधील विश्वसनीय सुत्रांनी दिली.
त्यामुळे भाजपच्या दोन जागांपैकी एक जागा शिवसेनेला तर एक राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून शिवसेनेच्या या खेळीमुळे राज्याच्या राजकारणात भाजप एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पालघर लोकसभेच्या जागेकरीता चार उमेदवार रिंगणात
ठाणे जिल्ह्यातील पालघर या लोकसभा जागेकरीता आज गुरूवारी काँग्रेसकडून दामू शिंगडा, भाजपकडून राजेंद्र गावित, शिवसेना श्रीनिवास वणगा, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे आज या जागेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.