भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज सांगलीत आल्यानंतर पक्षाच्या विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह स्थानिक भागातील आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, सरकार गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी चुळबुळ झाली की पवार घराण्यात फूट पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी जे पेरलं तेच उगणार असा उपरोधिक टोलाही लगावला.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सांगली जिल्ह्यातील संघटनेची परिस्थिती वाईट आहे. राष्ट्रवादीला तर शाखेपासून सुरुवात करण्याची वेळ आली आहे. एखाद्या रुग्णाला संधिवात झाल्यावर सूज येते. तशी सूज राष्ट्रवादील गेल्या अडीच वर्षांत आली होती. पण, सरकार गेल्यानंतर ती सूज आता एका झटक्यात ओसरून गेली अशी टीका त्यांनी यावेळी केली.
गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही हल्लाबोल करताना म्हणाले, सांगली हा प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असून, ते स्वत:च निवडून येऊ शकतात. तासगावमध्ये सुमन पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक हे त्यांच्या हिंमतीवर निवडून येतात. जयंत पाटील यांच्या पाठीमागे फक्त प्राजक्त तनपुरे आहे, बाकी कोण नाही, असा टोलाही त्यांनी जयंत पाटील यांना लगावला.
सत्तेत असताना राष्ट्रवादीला भाजपाचा एकही आमदार फोडता आला नाही. भाजपा हा विचारांवर प्रेरित होऊन काम करणारा पक्ष आहे. मात्र, सरकार गेल्यावर इतकी चुळबूळ झाली की, पवार घराण्यातच फूट पडते, असं वातावरण निर्माण झालं. तुम्ही राज्यातली एवढी घर फोडली आहे, त्यामुळे जे पेरलं तेच उगवणार आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.