ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. मात्र या पुलावरून ठाण्याच्या राजकिय वर्तुळात सध्या दावे-प्रतिदावे चांगलेच रंगल्याचे पाह्यला मिळाले. विशेष म्हणजे हे दावे-प्रतिदावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगल्याचे पाह्यला मिळाले.
या पुलाच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक शब्दांत टोला लगावताना म्हणाले, या पुलासाठीची मागणी मी पुढे रेटली होती. ती मान्य झाली, पुलाच्या कामाची सुरुवात झाली आणि आज त्याचा शेवट झाला. कुणीतरी असं काम सुरू करतं, उद्घाटनाला दुसरं कुणीतरी असतं. त्यात काय एवढं, असे सांगत “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावलेल्या टोल्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीही तितक्याच खोचक शब्दांत प्रतिटोला लगावला. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें म्हणाले, कौन किसकी शादी में जा रहा है, हे सगळ्यांना माहिती आहे, असं खोचक शब्दात म्हणाले.
दरम्यान, आव्हाडांच्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर देताना आव्हाडांना लक्ष्य करताना म्हणाले, कुणीतरी वेगळं उद्घाटन करत नाहीये, राज्याचा मुख्यमंत्री उद्घाटन करणार आहे. आणि हा सगळा खर्च महापालिकेनं केला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वैयक्तिक खर्चातून हा प्रकल्प झालेला नाही. प्रयत्न सगळेच करत असतात. आमदार, खासदार, महापौरही प्रयत्न करतात. सगळ्यांच्याच प्रयत्नातून प्रकल्प होत असतात. पण प्रकल्प करण्याची दानत आणि इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती आमच्याकडे आहे, असंही म्हणाले.
ठाण्यात आम्ही अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. आम्ही कधीच दुजाभाव केला नाही की अमुक मतदारसंघात कुणाचा आमदार आहे. कोट्यवधी रुपयांची कामं ठाणे पालिका हद्दीत केली आहेत. आणि लोकांना माहिती आहे की कोण किस के शादी में जा रहा है असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.