राज्यात ईडीने थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत पुष्पक ग्रुपची संबधित साईबाबा कंपनीची मालमत्ता जप्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या मुलीला इथे महाराष्टात ठेवणार नाही आणि मुलीला इथे नुसतं बोलावले तरी ती आत्महत्या करेल असे वक्तव्य केले. आव्हाड यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. तसेच, या वक्तव्यवरू आदित्य ठाकरेंना देखील त्यांनी जाब विचारला.
श्रीधर पाटणकर यांच्यावर मालमत्ता ईडीने जप्त केल्याचे वृत्त बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये आणि आमदारमध्ये एका वेगळेच वातावरण निर्माण झाले. त्या अनुषंगाने जितेंद्र आव्हाड यांनी एका दूर चित्रवाहिनीशी बोलताना म्हणाले की, माणसाला भीती खात असते. रात्री ३ वाजता टकटक झाले, तर हार्ट अटॅक येण्याचीच शक्यता असते. ध्यानी-मनी-स्वप्नीच नसते कुणाच्या घरात कोण घुसेल हे… यात सर्वात हाल होतात ते अशा माणसांचे ज्यांचा तुमच्या राजकारणाशी संबंध नसतो. माझ्या मुलीचा राजकारणाशी संबंध काय? पण तिला जर उद्या नुसतं बोलवले, तरी ती आत्महत्या करेल. ते फ्री बर्ड्स आहेत. त्यांना या असल्या सवयी नाहीयेत असे वक्तव्य करत मला वाटते की तिने या देशात राहू नये असे थेट खळबळजनक विधान केले.
दरम्यान, आव्हाडांच्या या विधानानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आव्हाडांच्या विधानावरून थेट आदित्य ठाकरेंना जाब विचारत म्हणाले की, स्वत: मंत्री पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राबद्दल असे गंभीर वक्तव्य करत असेल आणि जगभरात आणि देशभरात महाराष्ट्रात हे बिकट परिस्थितीत चाललेलं राज्य आहे असा प्रचार करत आहेत, तर हा महाराष्ट्र द्रोह नाही तर काय आहे? असा सावल करत यावर शिवसेनेचे नेते तथा राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली.