आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टूडे-सी-व्होटर कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणात भाजपाला प्रतिकूल परिस्थिती दाखविली आहे. तर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना अनुकूल परिस्थिती दाखविली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाच्या विरोधात बांधण्यात येणाऱ्या आघाडीवर भाष्य करत, राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती अनुकूल नाही. सुदैवाने दोन दिवसांनी संसदेचे अधिवेशन होत आहे. तिथे सगळेच भेटतील आणि चर्चा होईल असे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज शनिवारी कोल्हापुरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्य्यांवरील प्रश्नांवर उत्तरं दिली. मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नास उत्तर देताना शरद पवारांनी एक मोठं विधान केले.
यावेळी शरद पवार म्हणाले, यामध्ये अद्याप काही सकारात्मक सांगण्यासारखं काही नाही. मी स्वत: अनेकांशी बोलतो आहे. अनेकांना एकत्र आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण काही ना काही तरी स्थानिक मुद्दे आहेत. आता उदाहरणार्थ केरळमध्ये आज डाव्यांचं आणि राष्ट्रवादी व अन्य सगळे एकत्र येऊन आमचं सरकार तिथे आहे. पण आमचा मुख्य विरोधक काँग्रेस आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ इच्छितो. पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती ही अनुकुल नाही. या अडचणी आम्हाला सोडवाव्या लागतील. सुदैवाने दोन दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू होईल. सगळेच लोक भेटतील आणि त्यामुळे हा संवाद सुरू करता येईल.
इंडिया टूडे सी व्होटर कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणावर शरद पवार बोलताना म्हणाले, ही जी एजन्सी आहे, त्यांची अचूकता ही यापूर्वी बरीच सिद्ध झाली. पण मी एकदम त्यामध्ये जाणार नाही. एक दिशा त्यांनी दाखवलेली आहे. ती दिशा सत्ताधारी पक्षाला सोयीची नाही असं दिसतं आहे.
देशभरात काँग्रेसच्या जागा वाढतील असं सर्वेमध्ये दिसतय ना, आता उदाहरणार्थ कर्नाटकचा सर्वे वेगळा आहे पण त्याची आम्ही सखोलपणे माहिती घेतली. त्यामध्ये आम्हाला स्पष्ट असं दिसतं की कर्नाटकात भाजपाचं राज्य राहणार नाही. लोक त्या ठिकाणी परिवर्तनासाठी उत्सुक आहेत. असंच चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल. पण उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्तावाचा भाग आहे, त्याची नेमकी माहिती आमच्याकडे नाही असेही ते म्हणाले.
असे चित्र कदाचित अनेक ठिकाणी असू शकेल. पण उत्तर प्रदेश हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याची निश्चित माहिती आमच्याकडे नाही. विरोधकांची मोट बांधण्यासाठी सर्व एकत्र काम करत आहे मात्र सध्य स्थितीबाबत अद्याप काही सकारात्मक सांगण्यासारखे काही नाही.