महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत उभ्या शिवसेनेवरच दावा केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा वाद सुरू आहे. त्यातच निवडणूक चिन्ह आणि शिवसेना पक्ष कोणाचा यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून कायदेशीर लढाई सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठे वक्तव्य करत शिंदे गटाच्या विजयाबाबतचे भाकित करणारे सूचक विधान केले.
१४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होऊ घातलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांना विचारलं असता ते म्हणाले, मी ज्योतिष सांगू का? कारण न्यायालयातील प्रकरणांवर मी कधी बोलत नाही. पण उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत. ते चिन्ह जाईल. ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल. ही टाका ब्रेकिंग न्यूज… असे भाकित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर देताना म्हणाले, आम्ही विकास केला आहे, मुलं जन्माला घातली नाव देण्याचा अधिकार कोणाला? वडिलांनाच ना? आमच्या विविध योजना महाराष्ट्रात आहेत. काल दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. पंतप्रधानांना बोलावलं, पैसे ते देतात. त्यात चुकीचं काय? अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केलं? हे त्यांनी सांगावं. मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत अडीच तास बसले. हे काय मुख्यमंत्री आहेत का? असा खोचक सवाल करत उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.
याशिवाय कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर भाष्य करताना नारायण राणे म्हणाले, कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत. विरोधकांना धुळीसारखे उडवणार आहोत. भाजपा ग्रामपंचायत ते लोकसभा सर्व निवडणुका गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट केले.