मुंबई: प्रतिनिधी
गणेशोत्सवापूर्वी मुर्तीकारांना शासन निर्णयाची माहिती दिली गेली नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. आता नवरात्रोत्सवाची तयारी झाली असल्याने देवीच्या मुर्ती तयार होण्यापूर्वी शासन निर्णय जाहीर केल्यास त्यांचे संभावित आर्थिक नुकसा होणार नाही. त्यामुळे नवरात्र उत्सवालाही गणेशोत्सवाचे नियम लागू आहेत का? असा सवाल करत यासंदर्भात बैठक घेवून शासन निर्णय जाहीर करावा अशी मागणी भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
मुंबईसह कोकणात मुर्तीकारांचे अनेक कारखाने आहेत. एकट्या मुंबईत लहान मोठे असे मिळून ५ हजार मुर्तीकारांचे कारखाने आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुर्तीकारांना शासन निर्णय कळविण्यात आला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे या मुर्तीकारांनी मोठ्या आकाराच्या गणरायाच्या मुर्ती तयार केल्या. कालांतराने याविषयीचे नियम जाहीर केल्यामुळे तयार करण्यात आलेल्या मुर्त्यांचे नुकसान होत आर्थिक फटकाही बसल्याचे त्यांनी पत्राच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून दिले.
नुकताच गणेशोत्सव संपल्याने आता हे सर्व मुर्तीकार आता नवरात्रीसाठी मुर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांनी काम सुरु करण्यापूर्वी सरकारने संबधितांची बैठक बोलवून त्यांना याबाबतची माहिती द्यावी. जेणेकरून त्यांचे आर्थिक नुकसान होणार नसल्याचे सांगत कि नवरात्रीसाठी गणेशोत्सवाचे नियम लागू करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.