मुंबई : प्रतिनिधी
मागील बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक काल ठरलेल्या दिवशी निर्विघ्नपणे पार पडली. तळागाळापर्यन्त जाऊन प्रचार करूनही २०१८-२३ या कालावधीसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदारांच्या उदासीनतेमुळे केवळ ३० टक्केच मतदान झाले. यात दिवंगत अभिनेते मछिंद्र कांबळी यांचे पुत्र प्रसाद कांबळी यांना मुंबई मध्यवर्ती शाखेतून सर्वाधिक मते मिळाली आहेत.
काल रात्री उशिरापर्यंत नाट्यपरिषदेची मातमोजणी सुरु होती. ७ मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे घोषित करण्यात येणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतून एकूण ११ उमेदवार विजयी झाल्याचे समजते. यात प्रसाद कांबळी ५६५ मतांसह अघाडीवर आहेत. त्यामागोमाग डॉ. गिरीश ओक (५५५), भरत जाधव (५५४), सुकन्या कुलकर्णी-मोने (५३४), विजय गोखले (५३४), डॉ. अमोल कोल्हे (५११), मंगेश कदम (४८५), सुशांत शेलार (४८४), राजन भिसे (४६९), विजय कदम (४६२), सविता मालपेकर (४५७) यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. यात कांबळी यांच्या आपलं पॅनलच्या ६, तर नाट्यपरिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या मोहन जोशी पॅनलच्या ५ उमेदवारांचा समावेश आहे.
बोरीवली, वसई, मुलुंड शाखेतून अविनाश नारकर (५७५) यांनी बाजी मारली आहे. या शाखेतून शरद पोंक्षे (५७३), ऐश्वर्या नारकर (५५८), मधुरा वेलणकर (५४९), अशोक नारकर (४४८) हे उमेदवारही विजयी झाले आहेत. ४५०० मतदारांपैकी केवळ १०२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
७ मार्चला या निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहिर झाल्यानंतर नाट्यपरिषदेच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. मियामक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होईल.