Breaking News

अजित पवार यांचा आरोप, आताचे सरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतेय प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का?...

अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाड्मय पुरस्कार अनघा लेले यांना कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मागील सहा दिवसात पडद्यामागे काही बर्‍याच घडामोडी झालेल्या दिसत असून १२ डिसेंबरला अचानक राज्य सरकारने आदेश काढत पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाद गांधी यांच्या पुस्तकासाठी अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला. साहित्य, संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या समितीने निवड केलेल्या पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणे त्यात सरकारने हस्तक्षेप करणे गैर आणि निषेधार्ह आहे असे स्पष्ट करतानाच त्यात राजकीय लोकांनी अजिबात ढवळाढवळ करायची नसते अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधान भवनात पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

६ डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारने २०२१ मधील उत्कृष्ट साहित्य निर्मितीचे पुरस्कार जाहीर केले. २०२१ मध्ये आमच्या सरकारने हे ३३ पुरस्कार जाहीर केले होते असेही अजित पवार म्हणाले.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,  शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून नवीन वाद काढायचे आणि नवीन समस्या निर्माण करायच्या व बेरोजगारी व महागाई या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा हेच काम राज्य सरकारचे सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आता तर राज्य सरकारने कहरच केला आहे असे सांगतानाच राज्य सरकारचा साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप हा निषेधार्ह आहे. वास्तविक यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली. तेव्हापासून साहित्य, संस्कृती व कला या सगळ्याला एक मानसन्मान मिळाला त्याचा एक आदर ठेवला गेला आणि तीच परंपरा असंख्य मान्यवरांनी पुढे चालवली आहे आणि त्याच प्रकारची घडी बसली असेही त्यांनी स्पष्ट केले.
साहित्य क्षेत्राला पूर्णपणे मुभा द्यायची असते. कारण त्यांच्या क्षेत्रात जसे अलीकडच्या काळात वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात त्याच क्रीडाप्रकारांनी नावाजलेले खेळाडू ज्येष्ठ असणार्‍यांना घेतले जाते. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करत आलो आहोत. परंतु कधी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. महाराष्ट्र भूषणासंदर्भात समितीने शिफारस केलेली नावे त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे असतात. शासनकर्ते म्हणून आम्ही नेहमी आदर केला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणीबाणीच्या काळात जाहीर झालेले पुरस्कार रद्द करण्याची घटना घडली होती. ती तर घोषित आणीबाणी होती त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मोजली होती. परंतु राज्यातील सध्याचे सरकार हे पुरस्कार रद्द करून अघोषित आणीबाणी लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत अजित पवार यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला.

साहित्य क्षेत्रातील या सरकारचा हा पहिलाच हस्तक्षेप नाहीय. वर्धा येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांची निवड जवळपास फायनल झाली हो. ती परंतु त्यांचे भाषण अडचणीचे ठरेल या भीतीने सरकारने संयोजकावर दबाव आणून त्यांची निवड रोखली असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

अरे बोलू द्या ना…प्रत्येकाला आपली मतं मांडू दे ना… संविधानाने… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, ती आपली परंपरा आहे. वैचारिक मतभेद असू शकतात… विचारांची लढाई, विचारांनी लढा ना… कुणी अडवले आहे असा सवाल करतानाच त्यामध्ये आमच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही अध्यक्षपद घेऊ देणार नाही. ही लुडबुड तुम्हाला कुणी करायला सांगितली आहे. हे आताचे राज्य सरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र निडर आहे हे अशा दबावाला जुमानणार नाही आणि त्यांनी अजिबात जुमानू नये असा सल्लाही अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

शरद बाविस्कर, आनंद करंदीकर यांनी जाहीर झालेले पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे हे सरकारला कळत नाही का? तुम्ही एक पुरस्कार रद्द करताय परंतु इतरांना दिलेले पुरस्कार ते नाकारत आहेत. त्यांच्या मनात काय खदखदत आहे. प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का? असा संतप्त सवालही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला.

हे पुरस्कार समितीने जाहीर केले होते. त्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप झालेला उघड – उघड दिसत आहे. यावर बोलत असताना लंगडं समर्थन करत आहेत. अरे तो अनुवाद केलेला आहे. त्याच्या आधी इंग्रजी पुस्तक वाचनात आले त्यावेळी बोलायचे होते. परंतु तशा पध्दतीने झाले नाही. साहित्य क्षेत्र असो किंवा कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रात राजकारण आणू नये राज्यकर्त्यांनी त्यामध्ये ढवळाढवळ करू नये असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

जर राज्याच्या हिताचे असेल, राज्याच्या एकसंघतेला कुठे धक्का लावणारा असेल किंवा आणखी काही करणारा असेल, देशद्रोही काम झाले असेल तर गोष्ट वेगळी आहे. चित्रपट निघाला की अनेकजण सोशल मिडियावर वेगवेगळी मागणी करतात सुरुवातीला तीव्रता असते पण नंतर मात्र वाद झाला की लोक चित्रपट पहायला जातात. जी समिती होती ती महाराष्ट्रातील आहे त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार केला असेल अभ्यास केला असेल ना? एका संबंधित मंत्र्यांचे लंगडं समर्थन आहे. त्यामुळे पुन्हा सांगतो हा अनुवाद आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *