अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम हिची बहीण हसीना पारकर हिच्याशी असलेल्या आर्थिंक सबंध आणि जमिन खरेदी करताना मनी लॉंडरींग केल्याचा ठपका ठेवत ईडीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. सध्या न्यायालयाने त्यांना ३ मार्च पर्यत ईडी कोठडी सुणावली आहे. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
नवाब मलिक यांना न्यायालयाने ३ मार्चपर्यत ईडी कोठडी सुणावल्यानंतर त्यांची ईडीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर काल दिवसभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतल तिन्ही पक्षांच्यावतीने मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर दिवसभर आंदोलन करण्यात आले. तर भाजपाकडून मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.
मात्र आज दुपारी अचानक नवाब मलिक यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जे.जे.रूग्णालयात दाखल केले. त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मलिक यांच्याबाबत ईडीकडून अद्याप कोणतीही माहिती जाहीर केली गेली नाही.
दरम्यान, ते अद्यापही मंत्रीपदावर कायम असल्याने त्यांच्यावर प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करण्यात येत आहेत.
दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप आह़े
मुनीरा यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर १९७० मध्ये मुनीरा व त्यांच्या आईच्या वाटय़ाला जमिनीचा समान हिस्सा आला. त्यावेळी त्या सात वर्षांच्या होत्या. त्या जमिनीची देखभाल मुस्तफा रंगवाला करायचा. मुनीरा या प्रौढ झाल्यानंतर त्यांनी रेहमान नावाच्या एका व्यक्तीला व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्यांची आई मरियम गोवावाला यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये मुनीरा या मालमत्तेच्या एकटय़ा वारसदार बनल्या. त्यावेळी मे. सॉलिड्स इंडस्ट्रीजचे मालक पटेल त्यांच्याकडे यायचे. त्यांची दोन गोदामे (शेड) या जमिनीवर होती. त्यांनी भाडे रकमेचा धनादेश मुनीरा यांना दिला. जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुनीरा यांनी पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल नावाच्या व्यक्तीला दिली होती. मात्र, या मालमत्तांच्या विक्रीचे अधिकार कोणालाही देण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर जमिनीची मालकी पटेल यांच्याकडे कशी गेली, त्यांच्याकडून नवाब मलिक यांना कंपनीची आणि जमिनीची मालकी कशी मिळाली याबाबत काहीच माहिती नसल्याचे मुनीरा यांनी ‘ईडी’ला जबाबात सांगितले.