कारवाईचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आश्वासन
मुंबईः प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेशात जवळपास ९ लाख बोगस मतदार असून या बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांच्याकडे केली.
त्यावर या ९ लाख बोगस मतदारांची नावे तपासून काढून टाकण्याची कारवाई करण्याचे आश्वासन अश्विनीकुमार यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात निरूपम यांच्यासह मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, प्रदेश महासचिव सचिन सावंत यांच्यासमवेत अन्य नेते सहभागी झाले होते.
मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५ ते २० हजार बोगस मतदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत या ९ लाख बोगस मतदारांच्या नावे मतदान होईल अशी भीती काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली.
मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ३० हजार, चांदीवली मतदारसंघात २३ हजार, अणुशक्तीनगर मतदारसंघात १६ हजार मतदार बोगस असल्याचे उघडकीस आली असून लोकशाहीसाठी असे बोगस मतदार असणे घातक असल्याची भीती मुंबई अध्यक्ष संजय निरूपम व्यक्त केली.
आगामी लोकसभा निवडणूका लक्षात घेवून मतदार याद्यांमधील बोगस मतदारांची नावे वगळण्याची मागणी त्यांनी केली.
ही नावे तशीच यादीत राहील्यास बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूकीच्या काळात एकाच फोटोच्या आधारे वेगवेगळ्या नावांनी मतदान कार्ड तयार करून त्याद्वारे बोगस मतदान केले जाते. त्यामुळे ही बोगस नावे तातडीने काढून टाकावीत अशी मागणीही लेखी निवेदनाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.