मुंबई: प्रतिनिधी
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन अद्यापही आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. तर काहीजणांना कमी वेतनात काम करावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर वीजेचा वापर वाढणे सहाजिकच आहे. मात्र वीज वितरण विभागाकडून वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठविण्यात आल्याने ही सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरणे अवघड बनले असल्याने वीज बिलेच माफ करावीत अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या शिष्टमंडळाने ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची भेट घेत एका निवेदनाच्या माध्यमातून केली.
केंद्रीय नेते अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन संपूर्ण वीजबिल माफ करावे अशी मागणी केली. त्यावर ऊर्जामंत्री राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा करण्यात आला. यावेळी भिम आर्मीचे मुंबई उपाध्यक्ष अविनाशजी गरुड, दक्षिण-मध्य मुंबई माजी अध्यक्ष अविनाश समुंदर, वैभव उजगरे आणि संतोष गायकवाड इत्यादी क्रांतीसाथी उपस्थित होते.तसेच यावेळी देण्यात आलेल्या निवेदनासोबत चेंबूर विभागातील सुमारे २०० नागरिकांचे विजदेयके मंत्री महोदयांना सुपूर्द करण्यात आले.