आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि त्यांच्या मुस्लिम पध्दतीने केलेल्या विवाहाचा मुद्दा उपस्थित झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रारींचा ओघ सुरु झाला. या तक्रारींवर सुनावणी घेत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपला निकाल देत समीर वानखेडे हे मुस्लिम नाहीत तर मागासवर्गीय आहेत असा निकाल दिला. मात्र समीर वानखेडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल करण्यात आली असून त्यावरील सुनावणीही लवकरच होणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याप्रश्नी काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
याप्रकरणी जात पडताळणी समितीने ९१ पानांचे आदेशपत्र काढले आहे. समितीने समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्रदेखील कायम ठेवले आहे. समीर वानखेडे तसेच त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारला नसल्याचेदेखील म्हणत ते अनुसूचित जाती (महार-३७) प्रवर्गातील असल्याचे या समितीने स्पष्ट केले. दरम्यान, जात पडताळणी समितीने काढलेल्या या निष्कर्षानंतर समीर वानखेडे यांनी एक ट्वीट करून सत्यमेव जयते अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
समीर वानखेडे यांच्या विरोधात माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, मनोज संसारे, अशोक कांबळे, संजय कांबळे या तक्रारदार दारांनी जात प्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवला होता. तसेच मूळ धर्म लपवून मागासवर्गीय असल्याचे भासवले असल्याचाही दावा या तक्रारदारांनी केला होता. मात्र तक्रारदारांनी केलेल्या दाव्याची ते पुष्टी करू शकले नाहीत, असे मतही जात पडताळणी समितीने नोंदवले आहे.
दरम्यान, अॅड.नितीन सातपुते यांनी राज्य सरकारच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कारभारावर विश्वास नसल्याने आपण समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. आता न्यायालयाकडूनच आम्हाला दिलासा मिळेल.
जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे निकालपत्र: