महाराष्ट्राचे मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ नितीन करीर यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिव पदाचा कार्यभार मनोज सौनिक यांच्या कडून स्वीकारला.
डॉ. नितीन करीर सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. डॉ. करीर यांनी एमबीबीएस पदवी घेतली. त्यांची १९८८ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सांगली, पुणे जिल्हाधिकारी म्हणून काम केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालक, नोंदणी महानिरीक्षक, पुणे महापालिकेचे आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, विक्रीकर आयुक्त, जमाबंदी आयुक्त या पदावरही काम केले आहे.
मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी मुख्य सचिव डॉ. करीर यांचे अभिनंदन केले.
नितीन करीर यांच्या जबाबदार कामकाज पध्दतीची एक आठवण –
२०१४ साली राज्यात सत्तांतर होऊन काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजपा शिवसेना युतीचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकल्पाची तयारी भाजपा-शिवसेना सरकारकडून सुरु करण्यात येत होती. त्यावेळी मुंबईत अनेक मेट्रो प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याची चर्चा प्रशासकीय आणि राजकिय वर्तुळात सुरु झाली होती. त्यावेळी एका संकेतस्थळाचा बातमीदार आणि सध्याचे एक वादग्रस्त उद्योगपती भाजपातील मोठ्या नेत्याचा संदर्भ घेऊन नितीन करीर यांच्या भेटीसाठी आले. मात्र त्यावेळी नितीन करीर यांनी त्या उद्योगपतीऐवजी बातमीदाराला प्रथम भेटीची वेळ दिली. तसेच बातमीदाराच्या प्रत्येक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देत पूरेसा वेळ दिला. त्यानंतर त्या संबधित उद्योगपतीला भेटीसाठी बोलावले.