मुंबई : प्रतिनिधी
विनोदी सिनेमांचा एक वेगळा चाहतावर्ग असतो. त्यामुळेच विनोदी सिनेमांची लाट कधीच ओसरत नाही. रुपेरी पडद्याच्या माध्यमातून चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात यशस्वी होणाऱ्या कलाकारांना प्रेक्षक डोक्यावर घेतात आणि पुन: पुन्हा त्यांच्या सिनेमांची वाटत पाहतात. ‘वाघेऱ्या’ या सिनेमात प्रासंगिक विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिनेमातील विनोदी मिशन फत्ते करण्यासाठी किशोर कदम, भारत गणेशपुरे आणि नंदकिशोर चौघुले हे तीन विनोदवीर एकत्र आले आहेत.
‘लांडगा आला रे आला’ ही गोष्ट लहानपणी सर्वानीच ऐकली आहे. लांडगा आला म्हणून कुणीतरी खोडी काढायची आणि मग अख्खं गाव जागं व्हायचं, अशी ती गोष्ट होती. या गोष्टीत थोडा फेरबदल केला आणि लांडग्याऐवजी गावात ‘वाघ’ आला तर काय गोंधळ उडेल! अगदी हाच गोंधळ ‘वाघेऱ्या’ या आगामी सिनेमातील वेड्यांच्या गावात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमात किशोर, भारत आणि नंदकिशोर हे तीन विनोदवीर एकत्र दिसणार आहेत. भारत गणेशपुरे ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हसविण्याचं काम अखंडपणे करीत आहे. नंदगकिशोर चौघुले हे नावही रिअॅलिटी शो तसंच सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. मराठीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कवी मनाच्या किशोर जरी गंभीर भूमिकांमध्ये लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला असला तरी त्याच्या काही विनोदी भूमिकाही स्मरणात राहण्याजोग्या आहेत. त्यामुळे ‘वाघेऱ्या’ या सिनेमात या तिघांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळणार यात शंका नाही.
गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच ‘बॉईज’सारखा हिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या ‘वाघेऱ्या’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच आणि ‘उनाड पोरं…’ या गाण्याचं सादरीकरण करण्यात आलं. संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यामधून ‘वाघेऱ्या’ नामक गावातील गमतीजमती प्रेक्षकांना दिसून येतात. गावात वाघ शिरला असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. या बातमीमुळे संपूर्ण गाव वाघाच्या दहशतीखाली येते आणि मग या वाघाला पकडण्यासाठी विविध शक्कला लढवल्या जातात. शिवाय, या सगळ्या गोंधळामुळे स्वत:च्या लग्नाला उभा असलेल्या वनअधिकाऱ्यालासुद्धा ताबडतोब वाघेऱ्या गावात पाचारण करावं लागतं, त्यामुळे त्याच्या मनाची झालेली घालमेल या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ‘वाघेऱ्या’ या सिनेमात ऋषिकेश जोशी, सुहास पळशीकर, लीना भागवत आणि छाया कदम या मराठीतील दिग्गज कलाकारांच्या कसदार अभिनयाची जुगलबंदीदेखील अनुभवता येणार आहे.