मुंबई : प्रतिनिधी
अनुभव हा मोठा गुरू असून तोच माणसाला शहाणा बनवत असतो. बॅालिवुडमध्ये बॅचलर स्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या अभिनेता सलमान खाननेही अनुभवाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना यशस्वीपणे करत गगरभरारी मारली आहे. आज सलमानच्या अभिनयाचा डंका जगभरात वाजतोय. ‘बजरंगी भाईजान’ हा सलमानचा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा हिंदी सिनेमा ठरला आहे. मित्रांना मदत करण्यासाठी सिनेमांची निर्मिती करणं किंवा महेश मांजरेकरांसारख्या मित्राच्या आग्रहाखातर मराठी सिनेमासाठी गायक बनणं ही सलमानची रूपं आजवर सर्वांनीच पाहिली आहेत. अनुभवाच्या या शिदोरीवरच सलमान आता गीतकार बनला आहे.
सलमान सध्या ‘रेस ३’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. रेमो डिसूझाच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटासाठी सलमानने एक रोमँटिक गाणं लिहिलं असल्याचं ‘रेस ३’चे निर्माते रमेश तौरानी यांनीच सांगितलं आहे. ‘रेस ३’च्या कथेत एका रोमँटिक गाण्याची आवश्यकता होती. सलमानने एक गाणं लिहिलं होतं. त्यातील भाव ‘रेस ३’च्या कथानकासाठी आवश्यक असणाऱ्या गीतासाठी पोषक असल्याने त्याचा समावेष सिनेमात करण्यात आला आहे. या गाण्याच्या लेखनाचं श्रेय सलमानलाच देण्यात येणार असल्याचंही तौरानी यांनी सांगितलं आहे. हे गाणंसुद्धा सलमानवरच चित्रीत करण्यात येणार आहे. परंतु हे गाणं कोणाच्या आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात येणार आहे हे रहस्य अद्याप उघड करण्यात आलेलं नाही. सलमानच्याच आवाजात जर हे गाणं रेकॅार्ड करण्यात आलं तर त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरेल.