मुंबई: प्रतिनिधी
कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. सरकारची भूमिका आणि निर्णयाबाबतचा अपप्रचार व गैरसमज टाळण्यासाठी आणि वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी निवडक मंत्री नियुक्त करून त्यांनी नियमित ब्रिफिंग करावी अशी सूचना काँग्रेस नेते तथा सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षिय बैठकीत त्यांनी वरील सूचना केली.
महाराष्ट्राने चाचण्या वाढवल्याने रूग्णांची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. कर्जफेडीसाठी गतवर्षीप्रमाणे पुन्हा मॉरेटोरियम योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करावी. केंद्राकडून कोरोना लसीचे वितरण रूग्ण संख्येच्या प्रमाणात होण्याबाबत विनंती करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
कठोर लॉकडाऊन लागू होणार असेल तर बाहेरगावी असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी म्हणून काही कालावधी देण्यात यावा. गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होणार असल्याची भीतीही त्यांनी यावेळी बैठकीत व्यक्त केली.
साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन!: नाना पटोले.
राज्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सरकारने सध्या विकेंड लॉकडाऊनसह काही कडक निर्बंध लावलेले आहेत. परंतु कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आणखी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकार जो निर्णय घेईल त्याला काँग्रेस पक्षाचे पूर्ण समर्थन राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. लोकांचे जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे. कडक निर्बंध अथवा लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर तो नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनसारखा नसावा. मोदींच्या नियोजनशून्य लॉकडाऊन निर्णयाने लाखो लोकांचे रोजगार गेले, लोकांचे प्रचंड हाल झाले तसे होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली. रेमडिसेवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून राज्यातील रुग्णांना ते सहज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना कराव्यात अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.