चंद्रशेखर आझाद यांना पुन्हा नजरकैदेत ठेवले
मुंबई : प्रतिनिधी
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उर्फ रावण हे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत. मात्र त्यांच्या आगमनाचा चांगलाच धसका राज्य सरकारने घेतलेला आहे. काल रात्रीपासून पोलिकांकडून सुरु करण्यात आलेले भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या अटकेचे सत्र अद्यापही सुरु असून आझाद यांना पुन्हा पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने तुरूंगातून सुटका केल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले चंद्रशेखर आझाद यांची आज २९ डिसेंबर २०१८ रोजी वरळी येथील जांबोरी मैदानावर जाहीर सभा ठेवण्यात आली होती. परंतु मुंबई पोलिसांनी दिलेली परवानगी अचानकरित्या रद्द करण्यात आली. त्यामुळे या सभेच्या ठिकाणी भीम आर्मीचे कार्यकर्त्ये येत होते. मात्र येणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचे सत्र आज सकाळपासून सुरुच आहे.
याशिवाय निळा झेंडा लावलेली रस्त्यावरील कोणतीही गाडी अडवून त्यातील व्यक्तींना आणि दुचाकीस्वार कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे. अटक करताना पोलिसांकडून लहान-मुले, वयोवृध्द असल्याचे पाहिले जात नसल्याची माहिती भीम आर्मीच्या महाराष्ट्र कोअर कमिटीचे प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली.
तसेच चंद्रशेखर आझाद यांना मालाड येथील मनाली हॉटेलच्या बाहेर पडण्यास मज्जाव केला असून हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या या भूमिकेचे पडसाद दलित कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटत असून त्यामुळे असंतोषही निर्माण होत आहे.