३०० ते ५०० जनावरे एका छावण्यात ठेवण्याची अट
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा, पिण्याची पाणी पुरेसे मिळेनासे झाल्याने त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच चारा छावण्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सासत्याने राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारकडून दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातला शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुर्नवसन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
यंदाच्या वर्षी म्हणावा तसा पाऊस न पडल्याने राज्यातील २० हजारे गावे आणि १५८ तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातच एप्रिल-मे महिना अद्याप अवकाश असतानाच दुष्काळी भागात पाण्याचे टँकर सुरु करावे लागले. यापार्श्वभूमीवर मानवी जीवनांचे ठीक आहे. परंतु जनावरांचे काय? असा सवाल विरोधकांबरोबरच शिवसेनेकडून उपस्थित करण्यात येत होता. त्यामुळे अखेर राज्याच्या मदत व पुर्नवसन विभागाकडून चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या चारा छावण्या सुरु करताना राज्य सरकारकडून काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. यापैकी पहिली अट म्हणजे एका चारा छावणीमध्ये किमान ३०० ते ५०० लहान-मोठी जनावरे ठेवायची. २) प्रत्येक शेतकऱ्याची लहान-मोठी मिळून फक्त ४ ते ५ च जनावरे छावण्यांमध्ये घ्यायची ३) चारा छावण्यामधील यापेक्षा जास्त जनावरांच्या संख्येत वाढ करावयाची असतील त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात तरी सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.