नागपूर: प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासनाने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी २१०० कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी आणि पुरग्रस्तांच्या मदतीकरीता राज्य शासनाने १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र शासनाकडे केल्याची माहिती अर्थ मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत जाहीर करा अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळातच अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात ही माहिती दिली.
ते म्हणाले की, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या ६६०० कोटी रुपयांपैकी २१०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरीत केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
राज्य शासनाने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७४०० कोटी रूपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७२०० कोटी रुपये अशी एकूण १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
Tags bjp cm uddhav thackeray farmers and flood affected person jayant patil ncp pm narendra modi shivsena
Check Also
दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपालांकडून नारळ
दिल्ली महिला आयोगातील २२३ कर्मचाऱ्यांना नायब राज्यपाल व्ही. सक्सेना यांनी २ मे रोजी दिल्ली महिला …