मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांच्या निधन होवून त्यांच्या पार्थिवाला अग्नीही मिळत नाही. तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने कालच अर्थात गुरूवारी दुपारनंतर त्यांचे कार्यालय तातडीने रिक्त करून विभागाकडे सुपुर्त करावे असे आदेश कृषी मंत्र्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बजाविल्याची धक्कादायक माहिती नुकतीच उघडकीस आली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपाठोपाठ त्यांचा विभागही इतका संवेदनहीन कसा झाला अशी चर्चा मंत्रालयात सुरु झाली.
कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे काल गुरूवारी पहाटे ४.३५ वाजता झाले. मंत्रिमंडळातील सहकारी असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकिय कामकाज रद्द न करता या शासकिय कार्यक्रमाचे उद्घाटन करत आपली भावना शुन्यता दाखवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या या भावनाशुन्यतेला काही तासांचा अवधी लोटत नाही, तोच त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने कृषी मंत्री स्व. फुंडकर यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फोन करून मंत्री महोदयाचे निधन झाले असून त्यांचे कार्यालय रिक्त करून व बंद करून त्याचा ताबा सामान्य प्रशासन विभागाकडे सुपुर्द करण्याचे आदेश दिल्याचे सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
त्यावर कृषी मंत्र्यांचे ओएसडी विपुल शिंदे यांना यांची माहिती मिळताच त्यांनी सामान्य प्रशासनातील त्या संबधित अधिकाऱ्याला फोन करून कार्यालय तर रिकामे करून देवू मात्र कृषीमंत्री स्व.फुंडकर यांच्या पार्थिवाला अग्नी तरी मिळू द्या असे सांगत परिस्थितीचे भान आणून देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत कृषी मंत्री स्व.फुंडकर यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागातून तसे फोनवरून आदेश आल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला.
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याप्रकरणी कानावर हात ठेवत याबाबतची माहिती नसल्याचे स्पष्ट केले.