मुखमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, एक दिवस यांना स्मशानात जावे लागेल. यांची लाकडे राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. जे करतायत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की यांची लाकडे रचली गेली आहेत. त्यांना राजकारणातून कायमचे हे राम म्हणावे लागेल असा गर्भित इशारा दिला.
तसेच शिवसंवाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
शिवसंवाद यात्रेसाठी संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर असून तिथे बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर दुपारी ईडीने कारवाई सुरू केली आणि लोकांचे लक्ष तिकडे वळवायला सुरुवात केली. मालमत्ता जप्त करण्याआधी त्यांना बोलवायला हवे होते असे मत व्यक्त करत त्यांच्या कारवायांमुळे सरकार अस्थिर होत नाही. उलट ज्या काही फटी होत्या, त्या बुजल्या गेल्या. यामुळे तीन पक्ष इतके एकत्र आले, की आता हे तुटणं शक्य नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर टीका करताना म्हणाले, सोमय्याांच्या बोलण्याला कोण विचारतंय? ते काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हवाला किंगचे भाजपाच्या लोकांशी संबंध असल्याचे पुरावे मी पंतप्रधान कार्यालयाला दिले. पण त्यावर ईडी कारवाई करत नाहीये. किरीट सोमय्यांना आजपर्यंत अनेकदा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या घोटाळ्यांची माहिती दिली. पण त्यांच्या तोंडातून शब्द निघालेला नाही. त्यांनी ज्या नेत्यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईची मागणी केली, ते सगळे लोक नंतर भाजपात गेले. त्यानंतर या महाशयांची वाचा गेली. मग यांच्यावर काय विश्वास ठेवताय? सोडून द्या असेही ते म्हणाले.