Breaking News

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शिवभक्त आणि पुणेकरांकडून अखेरचा निरोप वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणेः प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाने भारावून जात केवळ शिवचरित्राची माहिती प्रसारीत करण्याचे काम अखेरपर्यंत करत राहणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांना शिवभक्त आणि पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला. त्यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभरी पार केली होती.
काही दिवसांपूर्वी ते बाथरूममध्ये घसरून पडल्याने आणि त्यांना न्युमोनिया आजार झाला होता. त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु अखेर पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्वात मुलगा अभिनेता पुरंदरे आणि २ मुली आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी त्यांच्या घरी आणि स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवाजी महाराजांचा इतिहासातील अनेक घटनांची माहितीसजीव स्वरूपात व्हावी या उद्देशाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील सजीव असा जाणता राजा या महानाट्याची निर्मिती केली. त्यांनी या महानाट्यात पहिल्यांदाच हत्ती, घोडे, उंटाचा वापर करत त्यात जीवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके, महाराजांवरील व्याख्यानमाला आदी सुरु केली. त्यांच्या जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग राज्यासह विदेशातही मोठ्या प्रमाणावर झाले. राज्यातील गड किल्ले आणि त्यावरील इतिहासाची साद्यंत माहिती त्यांच्या तोंडी होती. ते कुठेही गेले, कोणाशी बोलत जरी असले तरी त्यांच्या तोंडून शिवाजी महाराजांच्या गोष्टी सहज तोंडातून बाहेर पडत असत. तसेच त्यांचा इतिहासही ते सांगत असत.
त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेना युतीचे सरकार असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी नुकतीच वयाची शंभरी पार केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत अनेकांनी त्यांचे अभिष्यचिंतन केले. तर त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *