मुंबई: प्रतिनिधी
सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाणे गरजेचे असून तसे आवाहन सर्व धर्मगुरूंना करणे आवश्यक असल्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली. या सूचनेची तात्काळ दखल घेत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यानुसार सर्व धर्मगुरूंशी संवाद साधावा आणि तळागाळापर्यत ही सूचना पोहोचवावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना दिली.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.