Breaking News

केंद्राकडून अनलॉक-४ मध्ये सवलतींचा वर्षाव मात्र missionbeginagain वर शांतता ? निर्णयाची अंमलबजावणी करणार की संघर्ष

मुंबई: विशेष प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधून केंद्र सरकारकडून आता सवलती देण्यात येत असून अनलॉक-४ अंतर्गत सिनेमा थिएटर, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमासाठी १०० नागरिकांच्या उपस्थितीसह मेट्रो प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय घेत त्याविषयीची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. तसेच राज्य सरकारांनी स्वतंत्र लॉकडाऊन जाहीर करण्यास अटकाव केला. यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसल्याने केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार की पुन्हा राज्याकडून स्वतंत्र लॉकडाऊन जाहीर करणार याबाबत अद्यापही अनिश्चितता असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

अनलॉक-४ मध्ये राज्यात आणि राज्यांतर्गत प्रवासास मुभा देत ई-पासची अट पुर्णपणे काढून टाकण्यात आली. याशिवाय लग्न, राजकिय आणि इतर कार्यक्रमाला १०० नागरिकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली. याशिवाय शहरातील सिनेमागृहे सुरु करण्यास परवानगी देत शाळा ते कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास, विद्यार्थ्यांना शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात जाण्यासही परवानगी देण्यात आली. मेट्रो सेवा करण्यास परवानगी देत राज्य सरकारांनी स्वतंत्र लॉकडाऊन जाहीर करू नये असे स्पष्टपणे बजाविण्यात आले.

याशिवाय केंद्र सरकारने अनलॉक-२, अनलॉक-३ मध्ये मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आली. मात्र राज्य सरकारने अद्याप मंदीरे सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. याशिवाय काही दिवसांपूर्वी ई-पास बंद करण्यास केंद्राने सर्व राज्यांना पत्र पाठवूनही राज्य सरकारने अद्याप त्या संदर्भात स्पष्ट निर्णय न घेता फक्त एस.टीतून प्रवास करणाऱ्यांना ई-पासमधून मुभा देण्यात आली. त्यामुळे अनलॉक-४ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची राज्यात अंमलबजावणी होणार की पुन्हा राज्याचा स्वतंत्र लॉकडाऊन जाहीर करणार याबाबत संभ्रवास्था आहे. केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारकडून लगेच मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जातात. मात्र २४ तासाचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप यासंदर्भात काहीच हालचाल नाही. त्यामुळे यात आणखी वाढच होत आहे.

यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार आणि राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याशी सातत्याने फोनवरून, एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मिशन बिगेन अनलॉक संदर्भात आज मार्गदर्शक तत्वे जाहीर होण्याची शक्यता नाही. मात्र उद्या एखाद्यावेळी त्याविषयी जाहीर होवू शकेल. परंतु मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षखाली बैठक होणार की नाही याबाबत कोणतीच कल्पना नाही.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *