शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेऊन आसामची राजधानी गुवाहाटी गाठली. त्यानंतर राज्य सरकारच्या अनेक विभागाकडून मोठ्या प्रमाणावर शासकिय आदेश, निधी वाटपाचे आदेश जारी केले. त्यामुळे हे सारे आदेश कोणत्या आणि कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात काढले असा जाब राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला एका पत्रान्वये विचारला.
२२ जून, २३ जून आणि २४ जून या तीन दिवसात मोठ्या प्रमाणावर निधी वाटपाचे आणि नव्याने काही शासन निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या अनेक विभागांकडून काढण्यात आले. त्यामुळे राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी २४ जूनला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवित यासंदर्भातील तक्रार दाखल केली.
विशेष म्हणजे या तक्रारीची दखल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तात्काळ घेत यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहित २२ जून, २३ जून आणि २४ जून या तीन दिवसांच्या कालावधीत इतके शासन निर्णय का जारी करण्यात आले असा सवालही राज्यपालांनी मुख्य सचिवांना केला. तसेच हे निर्णय घेण्यात का आले त्याची पार्श्वभूमी काय असे सवाल उपस्थित करत राज्यघटनेतील कलम १६७ अन्वये त्या गोष्टींची माहिती राज्यपालांना सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या सर्व शासकिय निर्णय का जारी करण्यात आली याची माहिती सादर करावे असे आदेशही राज्यपालांनी त्या पत्रान्वये मुख्य सचिवांना दिले.
संदर्भासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रविण दरेकर यांचे पत्रही संदर्भासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना त्यांच्या पत्रासोबत पाठविले आहे.
त्यावर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनीही यासंदर्भात प्रशासनास आदेश देत सर्व माहिती गोळा करून ती राज्यपाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले.
हेच ते राज्यपालांचे पत्रः