मराठी ई-बातम्या टीम
वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील काही भागात १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. तसेच या परिक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घ्या नाहीतर थेट रद्द करण्याची मागणी केली. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही महत्वाचे निर्णय घेतल्याची माहिती दिली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे आज मंडळाने जाहीर करत यंदाच्या परीक्षांमध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये अगदी परीक्षा केंद्रांपासून अधिक वेळ वाढवून देण्यापर्यंतचे तरतूद करण्यात आली त्याची माहिती पुणे येथील पत्रकार परिषदेत दिली.
असे आहेत नवे नियम:-
१) बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च २०२२ दरम्यान ऑफलाइन पद्धतीने होणार.
२) १४ फेब्रुवारी ते ३ मार्च तोंडी परीक्षा तसेच प्रॅक्टीकल परीक्षा होतील.
३) दहावीच्या लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान ऑफलाइनच होतील.
४) २५ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा होतील.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे महाविद्यालय किंवा शाळा हेच उपकेंद्र असेल अशी रचना करण्यात आलीय.
५) एखाद्या शाळा किंवा महाविद्यालयामध्ये १५ पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर जवळचं महाविद्यालय केंद्र असणार आहे.
६) करोना काळात ऑनलाईन वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झालाय ही बाब लक्षात घेऊन वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
७) ४० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार.
८) १० मिनीटं आधी प्रश्नपत्रिका देणार.
९) ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटांचा अधिकचा कालावधी देण्यात येणार आहे.
१०) ७० ते १०० गुणांची परीक्षा असल्यास अर्धा तासाचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.
११) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नियम लागू असतील.
१२) करोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसवलं जाणार आहे.
१३) परीक्षेला विद्यार्थी झीक झॅक पद्धतीने सुरक्षित अंतर ठेऊन बसतील असे नियोजन करण्यात आले आहे.
१४) करोनामुळे परीक्षा देण्याची संधी हुकली तर ३१ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पुन्हा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
१५) एक्सटर्नल एक्झामिनर म्हणजेच तोंडी परीक्षांसाठी बाह्य शिक्षक नसणार. एकाच विषयाचे दोन शिक्षक असतील तर तेच घेणार परीक्षा.
१६) एक्सटर्नल शिक्षक आला तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो. म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.
१७) परीक्षांचे पर्यवेक्षक हे शाळा कॉलेजमधील असतील की बाहेरील हे लवकरच ठरवलं जाईल.
१८) अतिरिक्त प्रमाणामध्ये फिरती पथकं नेमण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेजांमध्येच केंद्र असल्याने कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलीय.
१९) परीक्षेसाठी लस बंधनकारक असणार नाही.