मराठी ई-बातम्या टीम
कोणत्या राजकीय नेत्यांची मुलं दारू पीत नाही ते सांगा असा प्रतिप्रश्न करत नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचा दावा करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचे काय असा उल्लेख करत कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि प्रसिध्द किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी पत्रकारांना देत तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असे आव्हानही दिले.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्याच्या निषेधार्थ सातऱ्यात दंडवत दंडुका आंदोलन केले. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे, यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढवळा म्हणजे अजित पवार असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितले. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावेदेखील असल्याचे सांगत विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचे आंदोलन करता आलं नसते. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारु विक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांनी रोखलं होते. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळाले होते. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.