लवकरच अधिसूचना काढण्याची गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
२१ व्या शतकात असूनही अनेक जाती-जमातींमध्ये लग्न करताना मुलींची पवित्रता तपासण्याचा अघोरी प्रकार अद्यापही सुरु आहे. यामध्ये कंजारभाट जमातीतील अनेक मुलींचे लग्ना आधी कौमार्य अर्थात पवित्रता तपासणी केली जाते. त्यामुळे या चुकीच्या प्रथेला आळा घालण्यासाठी कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचाराचा भाग समजण्यात येणार असून तशी अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.
कौमार्य चाचणीच्या प्रथेवर कडक कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून हा प्रकार लैंगिक अत्याचार मनाला जाणार आहे. तसेच अशी घटना उघडकीस आली तर त्याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर जात पंचायती कायद्यात सुधारणा करून लवकरच याची अधिसूचना काढण्यात येणार आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात शिवसेनेच्या नेत्या तथा प्रतोद नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने जात पंचायती विरोधी समिती सदस्य आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची जात पंचायतीच्या अत्याचारक रुढीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
ज्या जात पंचायती स्त्रीयांना अपमानजनक वागणूक देत असतील त्या जमातीच्या संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी गोऱ्हे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यानी केल्याचे सांगत आता दर दोन महिन्यांनी राज्यातल्या सर्व जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याचा पाठपुरावा करण्यात येणाऱ असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कौमार्य चाचणी करणाऱ्या जमातीत या अनिष्ट रुढीला प्रोत्साहन देणाऱ्यांच्या विरोधातही महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.