मुंबईः प्रतिनिधी
मुंबईला नागपूरला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा असून हा महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करत महामार्गाच्या माध्यमातून पैसे उकळण्याचे काम केलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना तेथेच नियुक्ती देत भ्रष्टाचार सुरु ठेवण्यासाठीच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
तसेच त्यांच्या नियुक्तीने शेतकऱ्यांवर अन्याय होईल अशी भितीही व्यक्त केली. बँलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षात १८ पेक्षा जास्त मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना क्लिनचिट मिळत गेली. त्याचधर्तीवर अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आता त्यांनाही मुख्यमंत्री क्लीन चीट देत असून एक प्रकारे भ्रष्टाचाराची पाठराखणच मुख्यमंत्री करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपचे
गेल्या तीन वर्षात ३०७ सिंचन प्रकल्पांसाठी ३९ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारकडून देण्यात आली. मात्र आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधकांनी ५० वर्षात ४६ हजार कोटी रुपये खर्च झाले. तरीही त्यावेळचे विरोधक आणि आताच्या सत्ताधाऱ्यांनी ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. मग आता ३९ हजार कोटी रुपयांची मान्यता देताना ही भ्रष्टाचार झाला का? असा सवाल मलिक यांनी करत याबाबत खुलासा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी केली.