औरंगाबाद : प्रतिनिधी
वीज चोरी संदर्भात प्रथम खबरी अहवाल देण्याकरता औरंगाबाद जिल्ह्यातील ५पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील सिडको आणि छावणी तर ग्रामीण भागातील चिकलठाणा, गंगापूर आणि सिल्लोड या तालुक्यांचा समावेश आहे. हे आदेश गृृह विभागाने २८ फेब्रूवारीला जारी केले आहेत. याबाबत पोलिस आयुक्त यशस्वी यादव आणि पोलिस अधिक्षक आरती सिंह यांनी आपल्याला काहीच माहिती नाही असे सांगितले.
यावेळी पोलिसआयुक्त यादव म्हणाले की, गृृहविभागाचे आदेश असतील तर त्यातच बघा काय आहे ते माझ्यापर्यंत अद्याप कोणतीही माहिती नाही. तर पोलिस अधिक्षक सिंग म्हणाल्या, मी एक महिन्यांपासून हैद्राबादेत आहे. अध्यादेश आपण अजून बघितला नाही. राज्यात वीज चोरी संदर्भात गुन्हे दाखल करण्यासाठी १३२ पोलिस ठाणे निवडले असून औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी पाच पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे.
रायगड, यवतमाळ, सोलापूर, अमरावती, अहमदनगर, बीड, नांदेड या जिल्ह्यांकरता प्रत्येकी ४ पोलिस ठाणे तर अकोला, बुलढाणा,चंद्रपुर,गोंदीया,हिंगोली जालना, परभणी, उस्मानाबाद, लातूर धुळे या जिल्ह्यांकरता प्रत्येकी ३ पोलिस ठाणे निवडले आहेत. तसेच भंडारा, कोल्हापुर, सिंधूदुर्ग, वर्धा या जिल्ह्यांकरता प्रत्येकी २ पोलिस ठाणे निवडले असून मुंबई उपनगर व नागपुरसाठी प्रत्येकी ७ त्याच प्रमाणे ठाणे जिल्ह्यासाठी १० पोलिस ठाणे निवडले आहे. राज्यात २६ लाख ९० हजार निवासी वीज ग्राहकांकडे २ हजार ३५१ कोटी रु थकबाकी असून २ लाख ३५ हजार कृषी ग्राहकांकडे ८८६कोटी थकबाकी आहे. तर अन्य ग्राहकांकडे ७ हजार २७४ कोटी रु.थकबाकी आहे.