Breaking News

मतदार नोंदणी सुरुः गृहनिर्माण सोसायट्यांध्ये मतदान केंद्र उभारणार विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर आणि नाशिक, मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. यासंदर्भात आज मंत्रालयात देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत देशपांडे यांनी ही माहिती दिली. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ ही अर्हता दिनांक असेल असे देशपांडे यांनी सांगितले.

या मतदारसंघांची मुदत पुढच्या वर्षी म्हणजेच जुलै २०२४ ला संपणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी दरवेळी मतदारांची नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघांकरीता येत्या ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल. हा टप्पा ६ नोव्हेंबरला संपेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीतही मतदार नोंदणी केली जाणार आहे.

पदवीधर मतदारसंघांसाठी, त्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ च्या किमान ३ वर्षे आधी भारतातील मान्यतापात्र विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १८ भरून त्यासोबत निवासाचा आणि पदवीचा पुरावा जोडावा लागेल. पदवीचा पुरावा म्हणून पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकाही ग्राह्य धरली जाईल, असेही देशपांडे यांनी सांगितले.

शिक्षक मतदारसंघासाठी त्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण निवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. १९ भरून, त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

मतदारांच्या नावात बदल झाले असतील, तर अर्जासोबत राजपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा संबंधित कायदेशीर पुरावादेखील जोडावा लागेल. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जाणार नाही, असेही देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राजकीय पक्ष देखील मतदार नोंदणीसाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज स्वतः छापून, त्याचे वितरण करू शकतील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने पदवीधर आणि शिक्षक मतदारांची अधिकाधिक नोंदणी व्हावी, यासाठी जनजागृती केली जात आहे. विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, विविध संस्था संघटना, शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँका या ठिकाणी पोहोचून पदवीधरांना नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज दिले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. राजकीय पक्षांनीही मतदार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्यास्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहनही देशपांडे यांनी केले.

या मतदार नोंदणीसाठी येत्या शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईल, वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरला, द्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्र. १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी सांगितले.

यासोबतच, विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – २०२४ अंतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी १७ ऑक्टोबर ऐवजी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असल्याची माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली .

राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांच्यासह इतर अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

११ लाखांवर मतदार मयत आढळले
निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या पुनरिक्षण कार्यक्रमात राज्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. ९५ टक्के काम पूर्ण झाले असून ८ कोटी ६४ लाख मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये ११ लाख १० हजार ८८१ मतदार मयत तर ७ लाख ४० हजार मतदार कायमस्वरूपी स्थलांतरीत झाल्याचे आढळले. १९ हजार मतदार त्यांच्या निवासाच्या ठिकाणी आढळलेले नाहीत, अशी माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

१२ लाख ४३ हजार नव्या मतदारांची भर
यंदा आतापर्यंत १२ लाख ४३ हजार नवीन मतदारांची भर पडली. त्यातील ९ लाख २३ हजार मतदारांचा यादीत समावेश करण्यात आला तर १ लाख १ हजार मतदार काही ना काही कारणास्तव रिजेक्ट झाले असे देशपांडे यांनी सांगितले.

तसेच पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सोसायट्यांच्या आवारातही मतदान केंद्रे उभारण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज दिली.

मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्या इमारतींमध्ये मोठ्या संख्येने लोकं राहतात. सोसायटीपासून मतदान केंद्र लांब असल्याने ते मतदानासाठी जाण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे अशा सोसायट्यांच्या आवारातच मतदानाची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी येत्या निवडणुकांमध्ये केली जाईल असे देशपांडे यांनी सांगितले.

पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज श्रीकांत देशपांडे यांची यासंदर्भात बैठक झाली. सोसायट्यांमध्ये मतदानकेंद्रे उभारण्याच्या निर्णयाचे लोकांकडून स्वागत होत असल्याचे त्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत शाळा, ग्रामपंचायत कार्यालये आदी सरकारी इमारतींमध्येच मतदान केंद्रे उभारली जात होती. पुढील निवडणुकीत प्रथमच सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारली जातील. त्या प्रक्रियेमध्ये एका ठिकाणची मतदान केंद्रे कमी होऊन दुसरीकडे ती उभारली जाऊ शकतात आणि कदाचित दोन हजारांवर मतदान केंद्रे वाढण्याचीही शक्यता असल्याचे मतही देशपांडे यांनी व्यक्त केले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *