Breaking News

उद्धव ठाकरे यांची टीका, खोकं रिकामं झालं असेल म्हणून डबड आणून ठेवलं

ठाणे शहरालगत असलेल्या मुंब्रा येथील शिवसेना शाखेची इमारत शिंदे गटाने पाडल्यानंतर त्या जागेवर शिंदे गटाने त्या जागेवर दावा करत तेथे कंटेनर ठेवत शिंदे गटाची शाखा सुरु केली. मुंब्र्यातील जागा परत मिळविण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दौरा केला. मात्र निर्माण झालेल्या तणावानंतर पोलिसांच्या विनंतीवरून उद्धव ठाकरे यांनी परत ठाण्यात येत पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांना माहित नाही की, त्यांच राजकिय आयुष्य हे फारच अल्पायुषी ठरलं आहे. त्यामुळे त्यांना जिकडे तिकडे घुसखोरी करायची सवय आहे. मुळात शिवसेना शाखेच्या इमारतीवर मुळात ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे का, ती त्यांनी पाडली. तसेच त्या जागेवर घुसखोरी करत त्यांनी त्यांच जे काही डबडं ठेवलं आहे त्यास काय प्रशासनाने परवानगी दिली आहे असा सवाल करत ते डबड आम्ही ठेवू देणार नसल्याचा इशारा शिंदे गटाला दिला.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, पोलिसांचा अनादर होईल असे मी वागलेलो नाही. राज्यातील पोलिस या खोके सरकारच्या दबावाखाली किती काम करतंय हे आझ पुन्हा एकदा दिसून आलंय. त्या सरकारमुळे पोलिसांकडून चोरांना, घुसखोरांना संरक्षण द्याव लागलं. वास्तविक पाहता त्यांच्यावर घुसखोरीचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असे मतही व्यक्त केले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्या जागेची सर्व कागदपत्रे, कर भरणाच्या पावत्या आदी कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आम्ही जागेच्या प्रश्नावर न्यायालयातही गेलो आहे. खरं सांगायचं तर आम्हीही ते बॅरिकॅडस् बाजूला सारून तेथे जाऊ शकलो असतो. पण ऐन दिवाळीत गुंडागर्दी नको म्हणून आम्ही दुरूनच त्या जागेची पाहणी केली.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, हे जर दोन तीन दिवस जाऊ द्या त्यानंतर आम्ही शिवसैनिक तेथे जाऊन संघटनेचे काम सुरु करतील. कदाचीत त्यांच खोकं रिकामं झालं असल्यानेच त्यांनी ते कंटेनरचं रिकामं खोकं तेथे आणून ठेवलं असेल असा टोलाही शिंदे गटाला लगावला.

हाच धागा पकडत शिंदे गटाला धडा शिकविण्यासाठी आगामी निवडणूक शिंदेंच्या विरोधात लढविणार का, तुम्ही ठाण्यात सभा वगैरे घेणार का असा सवाल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांना धडा शिकविण्यासाठी मी कशाला येथे यायला पाहिजे. इथले ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील असे सांगत आनंद दिघेंचाच स्वभाव होता. त्यामुळे ठाणेकरच गद्दारांना धडा शिकवतील आणि त्यांना पराभूत करतील. तसेच दिवाळीनंतर ठाण्यात शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची सभा घेणार असल्याचेही सांगितले.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी पूर्वी म्हणालो होतो की, निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव देण्याचा भलेही अधिकार असेल पण एका राजकिय पक्षाचे नाव काढून ते दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की शिवसेना एकच आहे ती म्हणजे परंपरागत असलेली आमची शिवसेना असल्याचा इशाराही निवडणूक आयोगाला दिला.

अजित पवार यांच्या आजारपणाबाबत आणि अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलेल्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या अजित पवार यांच्याशी संपर्क नाही. त्यामुळे त्यांना कसला ताप आलाय कि सहकाऱ्यांचा मनस्ताप होतोय याची काही माहिती नाही. त्यामुळे त्याबाबत आता बोलणार नाही. त्यासाठी नंतर येणार असल्याचेही सांगितले.

 

Check Also

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *