शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर या बंडखोरांकडून भाजपाशी जुळवून घ्या म्हणून उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केले. त्यातच खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित राष्ट्रपती पदासाठी भाजपाच्या उमेदवार असलेल्या द्रोपद्री मुर्मु यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. यावरून खासदारही फूटीच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानुसार अखेर उध्दव ठाकरे यांनी भाजपाच्या द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा जाहिर केला. उपराष्ट्रपती पदासाठी मात्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबरोबरच खासदारांकडूनही कोणाला पाठिंबा द्यावा यासाठी एका अक्षरानेही मागणी केली नाही. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली. याबाबत अखेर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत भाष्य करत ही उत्सुकता संपुष्टात आणली.
उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. त्यात काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या नावावर एकमत झाले. या बैठकीला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे ही उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना ते म्हणाले, मार्गारेट आल्वा यांच्या नावावर सर्वांचे एकमत आहे. त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असे सांगत शिवसेना मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले.
आजच्या बैठकीला १७ पक्ष होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा झालेली आहे. सर्वांचे मार्गारेट अल्वा यांच्या नावावर एकमत आहे. त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपा विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला एकूण १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आल्वा केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या, गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी कारभार पाहिला आहे. त्या राज्यसभा सदस्य होत्या. आम्ही काही नावांवर चर्चा केली आणि शेवटी एकमताने मार्गरेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे, अशी माहिती शरद पवार यांनी ही बैठक संपल्यानंतर दिली.
देशाच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. तर १९ जुलै ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या १० ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पुरस्कृत उमेदवार समर्थनासाठी देशभर दौरे करत आहेत. तसेच येत्या ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुरस्कृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.