रत्नागिरी जिल्ह्यामधील महसूल विभागातील दोन अधिकारी मंत्र्यांच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चिपळूणचे तहसिलदार जयराम सुर्यवंशी यांची ओएसडी म्हणून नियुक्ती करून घेतली आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ओएसडी म्हणून तहसीलदार सूर्यवंशी यांना तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सुशांत खांडेकर यांना पीए म्हणून घेतले आहे.
महसुल विभागामधील त्या-त्या क्षेत्रात पारंग असलेल्या अधिकार्यांची चाचपणी करून या मंत्र्यांनी हे अधिकार्यांना मागून घेतले आहेत. राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर शिवसेनेतील बंडखोर गटाचे म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार अस्तित्वात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या विस्तारामध्ये रत्नागिरीचे उदय सामंत यांना उद्योगमंत्रीपद देण्यात आले. उदय सामंत यांनी जे मंत्रीपद मिळाले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही गतीमान आहे. कामाचा निपटारा होण्यासाठी त्यांचे अनेक पीए (स्वीय्य सहायक) आहेत. उद्योग विभागाकडची कामे अधिक गतीने व्हावी, याकरीता सामंत यांनी चिपळूणचे तहसीलदार जयराम सूर्यवंशी यांना ओएसडी म्हणून घेतले आहे.
सिंधुदुर्गचे दीपक केसरकर यांना शालेय शिक्षणमंत्री पद मिळाले आहे. त्यांच्याकडेही राजकाराणाचा मोठा अनुभव आहे. हुशार व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनीही शिक्षण विभागाचा कामाला जास्तीत जास्त गती देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. रत्नागिरीची निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांना त्यांनी पीए म्हणून घेतले आहे. जिल्ह्यातील महसुल विभागातील महत्त्वाचे दोन अधिकारी गेल्याने महसूल विभागावर कामाचा अधिक ताण पडला आहे.