Breaking News

उध्दव ठाकरे यांचा खोचक सवाल,… भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? कातळशिल्पे वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र पाठविणार

जागतिक वारसा वास्तूचा ठेवा असलेली कातळशिल्पे सोलगांव येथे असून बारसू येथे येऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पामुळे ही कातळशिल्प धोक्यात येणार आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे वाचविण्यासाठी आपण जागतिक संघटनेला पत्र लिहिणार असून पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे त्याची आठवणही पर्यावरण संघटनेला पत्र पाठवून करू देणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पवारून राजकीय घमासान सुरू आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात उघड उघड शाब्दिक चकमकी घडत आहेत. त्यातच, आज उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. बारसूतील ग्रामस्थांची भेट घेत त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीकाही केली. तत्पूर्वी सोलगांव येथील कातळशिल्पांची पाहणीही उध्दव ठाकरे यांनी केली.

उध्दव ठाकरे बोलताना म्हणाले, ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. तेव्हा ३३ देश काय महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील लोकही यांना ओळखत नव्हती. जेव्हा (समृद्धी महामार्गावेळी) विरोधाला लोक रस्त्यावर उतरली, माझ्याकडे धावत आली होती, तुम्ही आल्याशिवाय प्रकल्प होणार नाही असं ते म्हणाले. तेव्हा संभाजी नगर, जालन्यात आम्ही फिरलो. ज्याची नोंद कागदावर ओसाड म्हणून केली होती, तिथे मोसंबीच्या फळबागा होत्या, त्यामुळे त्यांची मोबदल्याची मागणी होती. यामुळे आम्ही मुंबईत बैठक घेतली. त्या फळबागा वाचवून बाजूने तो रस्ता कसा जाईल, याची आखणी केली. तो विरोध आम्ही मोडून नाही काढला. तो समजून घेतला, तिथल्या विरोधकांची समजूत काढून, बागा वाचवून मग तो रस्ता झाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच उध्दव ठाकरे म्हणाले, बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या. मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असं म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी विरोधामागील कारण स्पष्ट करताना म्हणाले, प्रकल्प चांगला असता तर आम्ही विरोध कशाला करु? मात्र ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे असं दिसतं आहे. मी पत्र दिलं होतं पण दडपशाही करुन प्रकल्प लादा म्हणून दिलं नव्हतं. निसर्गरम्य हा परिसर आहे. त्या परिसराचा, निसर्गाचा ऱ्हास करून हा प्रकल्प नको आहे. चांगल्या गोष्टी आपण जरुर केल्या. चिपी एअरपोर्टही माझ्या कालखंडात आला. इथल्या मोठ्या आणि सूक्ष्म माणसांना तो आणता आला नाही. जर एवढा चांगला प्रकल्प असेल तर तुम्ही लोकांसमोर का जात नाही? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? ते मला मुळीच मान्य नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल

साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *