विरोधकांनी विधानसभेत २९३ अन्वये मराठवाडा-विदर्भातील अनुशेष भरतीच्या अनुशंगाने काल दुपारपासून चर्चा करण्यात येत होती. त्या प्रस्तावाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विदर्भ आणि मराटवाड्यातील उद्योगांसाठी विशेष ऊर्जा धोरण करण्यात येत असल्याची घोषणा केली.
विदर्भ मराठवाडा भागातील उद्योगांना वीज सवलत देण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत असून राज्याच्या ३९,६०२ कोटींच्या ऊर्जा योजनेला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या विदर्भ मराठवाडा विकास चर्चेवर देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत होते.शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सरकारी जमिनिसोबात खासगी जमिनींना भाडे देऊन सौर ऊर्जा तयार करण्यात येईल. केवळ महाराष्ट्रासाठी केंद्राने बळीराजा संजीवनी योजना मंजूर केली असून त्यात विदर्भातील ६९ आणि मराठवाड्यातील १७ प्रकल्प आहेत असं फडणवीस म्हणाले.
विदर्भातील ८४,५८८ खाते धारकांच्या आठ लाखाहून अधिक हेक्टर जमिनींची मालकी घोषित करण्यात आली आहे, दूध संकलन २,१०,००० लिटर अधिक होऊ लागलं आहे, शेतकऱ्यांना ४८ रुपये लिटर इतका भाव मिळाला आहे, स्वाधार योजने अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना ओबीसी हॉस्टेल मध्ये जागा मिळणार नाही अशा हुशार विद्यार्थ्यांना थेट खात्यात पैसे जमा करण्याची योजना आखली आहे, आदिवासी विद्यार्थ्यांनाही फेलोशिप साठी मदत दिली जाणार आहे.
गोसीखुर्द चे लाभक्षेत्र एक लाख हेक्टर पर्यंत वाढवलं आहे, बेंबळा, लोअर वर्धा आदी सर्व योजनांना गती दिली आहे, आघाडी सरकारने अडीच वर्षात एकही सूप्रमा दिली नाही मात्र आम्ही ते सुरू केलं आहे असं फडणवीस यांनी सांगितलं.
त्याचबरोबर राज्यातील ऊर्जा वसूलीवरून यापूर्वी चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी वीज बिलांच्या वसुलीत वाढ झाली असून यावर्षी जवळपास ४७ हजार कोटींची वसूली झाली आहे. त्याचबरोबर राज्यातील ऊर्जा निर्मिती आणि पुरवठ्यासाठी नवी केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. याशिवाय पूर्वी वीज मीटरचे फोटो अस्पष्ट असायचे त्यामुळे अंदाजित बिले ग्राहकांना देण्यात येत होती. मात्र आता त्याचे प्रमाण घटविण्यात आले असून आता स्पष्ट फोटोच्या आधारेच आपण योग्य वीज बिले ग्राहकांपर्यंत पोहचवित असल्याचे त्यांनी सांगितले.