राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सर्वपक्षिय नेत्यांनी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रश्नी पुन्हा आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात सत्ता सहयोगी पक्षाच्या आमदारांच्या घरांच्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पत्र लिहिले. या पत्राद्वारे संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली. तसेच या प्रश्नाकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी आणि राज्यात घडत असलेल्या घडामोडींची माहिती देत चर्चा करण्यासाठी ५ आणि ६ नोव्हेंबर रोजीची वेळ द्यावी अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्राद्वारे केली.
तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी वेळ दिल्यास शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत, विनायक राऊत, विधिमंडळातील विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी, लोकसभेचे खासदास अरविंद सावंत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि विधाससभेचे आमदार अजय चौधरी आणि सुनिल प्रभू हे चर्चेच्या शिष्टमंडळात असतील असेही स्पष्ट नमूद केले.
विशेष म्हणजे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या सर्व दिवसभराचा कार्यक्रम यापूर्वी राष्ट्रपती भवनाकडून निश्चित करण्यात येत होता. मात्र हल्ली त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमाचे नियोजन पंतप्रधान कार्यालयाकडून होते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या भेटीची वेळ उपलब्ध करून देण्यात येईल का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांना पडला आहे.